पुणे - अन्नसुरक्षा योजनेंतर्गत रेशनवरील सवलतीच्या दरातील धान्याची ज्यांना आवश्यकता नाही, अशा आर्थिकदृष्टया सक्षम लाभार्थ्यांनी स्वेच्छेने बाहेर पडावे, असे आवाहन अन्नधान्य वितरण विभागाने केले होते. परंतु एकही लाभार्थी त्यातून स्वेच्छेने बाहेर पडला नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आजही अनेक गरीब, गरजू आणि वंचित लाभार्थ्यांना अन्नधान्यापासून वंचित राहावे लागत आहे.
अन्नसुरक्षा योजनेंतर्गत रेशनकार्डधारकांना गहू दोन रुपये आणि तांदूळ तीन रुपये किलो या सवलतीच्या दराने उपलब्ध करून दिला जातो. काही वर्षांपासून अन्नसुरक्षा योजनेचा लाभ घेणाऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झालेली आहे. त्यामुळे अन्न, नागरी पुरवठा विभागाने या सवलतीच्या दराने अन्नधान्याचा लाभ घेण्याची आवश्यकता नसलेल्या रेशन कार्डधारकांना अन्नधान्य नाकारण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
जे खरोखरच गरजू आणि गरीब आहेत, ज्यात हात गाडीवाले, कचरा वेचक, भूमिहीन, अल्पभूधारक, कामगार, अल्प उत्पन्न गटातील कुटुंबे, विधवा, परितक्त्या, झोपडपट्टीतील रहिवासी, हमाल यांना या योजनेचा लाभ देणे आवश्यक आहे. परंतु अद्याप काही पात्र कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही. शहरी भागात वार्षिक उत्पन्न ५९ हजार रुपयांहून असलेले लाभार्थी धान्यापासून वंचित राहावे लागत आहे. अशा लाभार्थ्यांनी स्वेच्छेने बाहेर पडल्यास वंचित असलेल्या अल्प उत्पन्न गटातील कुटुंबांना अन्नधान्य मिळणार आहे. त्यामुळे सवलतीच्या दरातील अन्नधान्याची आवश्यकता नसल्यास स्वेच्छेने या योजनेतून बाहेर पडावे, असे आवाहन अन्नधान्य वितरण अधिकारी अस्मिता मोरे यांनी केले होते.
केंद्र सरकारने घरगुती वापराच्या गॅसवर 'अनुदानातून बाहेर पडा' या नावाने योजना सुरू केली आहे. अनेक लाभार्थी या योजनेमध्ये समाविष्ट झाले आहेत. त्यामुळे अनुदानाच्या निधीची बचतही झाली आहे. सवलतीच्या दराने अन्नधान्याचा पुरवठा करण्याकरिता खरेदीपोटी आणि लाभार्थ्यांपर्यंत धान्य पोचविण्यासाठी अनुदानापोटी केंद्र आणि राज्य सरकारला आर्थिक भार सोसावा लागत असल्याचे अन्नधान्य वितरण विभागाकडून सांगण्यात आले.
अन्नधान्य सुरक्षा योजनेतून सवलतीच्या दरात धान्य घेणाऱ्या ज्या रेशनकार्डधारकांची आर्थिक स्थिती चांगली आहे. त्यांनी धान्य घेऊ नये, असे आवाहन केले होते. परंतु आर्थिकदृष्ट्या सक्षम असूनही एकही रेशनकार्डधारकाने योजनेतून बाहेर पडण्याची तसदी घेतलेली नाही.
- अस्मिता मोरे, अन्नधान्य वितरण अधिकारी
पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील अन्नसुरक्षा योजना शिधापत्रिका संख्या - ३ लाख १ हजार ८८६
लाभार्थी - १२ लाख ४३ हजार १४८
Edited By - Prashant Patil
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.