पुणे, ता. ३१ ः चांदणी चौक येथील नवीन पुलाजवळील साखळी चोरीच्या प्रकरणात बावधन पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीला सात दिवसांची पोलिस कोठडी देण्यासाठी केलेला अर्ज पौड येथील न्यायालयाने फेटाळला. अटकेच्या प्रक्रियेत भारतीय नागरिक सुरक्षा संहितेनुसार तरतुदींचे पालन झाले नसल्याचे निदर्शनास आल्याने न्यायालयाने अटक बेकायदा ठरवत आरोपीला तत्काळ सोडून देण्याचे आदेश दिले.
बावधन पोलिसांनी आकाश ऊर्फ बाल्या शिंदे या आरोपीला शुक्रवारी (ता. २८) रात्री ११ वाजता अटक केली आणि शनिवारी पौड येथील प्रथम वर्ग न्यायिक दंडाधिकारी एस. एस. पाटील यांच्या न्यायालयात हजर केले. पोलिसांनी आरोपीला सात दिवसांची कोठडी देण्याची मागणी केली होती, ज्यामध्ये चोरीला गेलेले सोन्याचे दागिने जप्त करणे, सहभागी साथीदारांचा शोध घेणे आणि इतर समान गुन्ह्यांमधील सहभागाची चौकशी करणे यांचा समावेश होता. बचाव पक्षाने अटकेची प्रक्रियाच बेकायदा असल्याचा मुद्दा उपस्थित केला. आरोपीचे वकील सुचित मुंडदा, ॲड. केतनकुमार जाधव, ॲड. शुभम बलकावाडे यांनी अटकेच्यावेळी पोलिसांनी अनिवार्य तरतुदींचे पालन केले नसल्याचा दावा केला. अटक करणाऱ्या अधिकाऱ्याने अटकेची माहिती आणि ताब्याचे ठिकाण तत्काळ आरोपीच्या नातेवाईक किंवा मित्राला कळवावे आणि पोलिस ठाण्यात नोंद करावी, असे स्पष्टपणे नमूद आहे. न्यायालयाने या प्रक्रियेचे काटेकोरपणे पालन झाले पाहिजे, असे स्पष्ट केले. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीच्या नातेवाईकाला अटकेची माहिती व्हॉट्सॲप संदेशाद्वारे पाठवली होती. वकील जाधव यांनी यावर आक्षेप घेतला की, केवळ व्हॉट्सॲप संदेश पाठवणे आणि कायदेशीर तरतुदींचे पालन झाल्याचा पुरावा न देणे, अटकेची प्रक्रिया वैध ठरवण्यासाठी पुरेसे नाही.