Rain News
Rain News esakal
पुणे

Pune Rain : गेल्या पावसाळ्यातून काही शिकलोय का?

- संभाजी पाटील

Pune Rain - पावसाळा येणार म्हटलं की, पुणेकरांच्या अंगावर काटा येतो. थोडा पाऊस पडला तरी रस्त्यावर वाहणारे पाणी, मेट्रोच्या दुभाजकांमुळे तुंबलेले पाणी, रस्त्यांची अर्धवट कामे आणि ठिकठिकाणचे खड्डे, काही मिनिटांमध्ये जाणारी वीज. पुण्यासारख्या महानगरात अशा गोष्टी गेली काही वर्षे सतत घडत आहेत, मग इथले प्रशासन, लोकप्रतिनिधी नेमकं कसलं नियोजन करतात?

पुण्यात साधारणपणे सात जून नंतर पावसाला सुरवात होते. पावसाचे हे गणित पुढे मागे होत असले तरी जेव्हा पाऊस सुरू होतो तेव्हाची शहरातील परिस्थिती फारशी चांगली नसते, याचा वारंवार अनुभव आपण घेत आहोत. खरे तर पावसाळा सुकर जावा यासाठी दरवर्षी पावसाळ्यापूर्वी एक दोन महिने आधी पावसाळापूर्व कामे करण्याची महापालिकेची जुनी प्रथा आहे. यात पावसाळी गटारे, ड्रेनेज, नाले सफाई, रस्त्याच्या खोदाईवर बंदी घालून त्याची डागडुजी, रस्त्यांचे डांबरीकरण, धोकादायक झाडे-फांद्यांची तोडणी अशा विविध कामांचा समावेश असतो.

महापालिकेच्या अंदाजपत्रकावर नजर टाकल्यास एक हजार कोटींच्या आसपास विविध विभागांची कामे सुरू असतात. नाले सफाई, पावसाळी पाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्यांची सफाई, ड्रेनेजच्या इतर वाहिन्यांची सफाई पावसाळ्यापूर्वी अत्यंत चोखपणे झालेली कागदोपत्री दिसते. पण एक तासभर जरी मोठा पाऊस झाला तरी शहरातील रस्त्यांना ओढा, नदीचे स्वरूप येते, हा अनुभव आहे.

जर शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवर स्ट्रॉम वॉटर लाइन बसविलेल्या आहेत, त्यांच्या सफाईवर न चुकता दरवर्षी लाखो रुपये खर्च होतात तरीही छोट्या पावसानंतरही रस्त्यावर पाण्याचे लोट का वाहतात. एकतर पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी लाईनच टाकलेल्या नसाव्यात, त्या टाकण्याची पद्धत चुकीची असावी किंवा त्यांची सफाई नीट होत नसावी.गेल्या वर्षी झालेल्या पावसाळ्यात शहरातील रस्त्यांची भीषण अवस्था झाली होती. त्यानंतर रस्ते दुरुस्ती, मजबुतीकरणावर पाचशे कोटी रुपयांचा खर्च झाला आहे.

जी २० च्या निमित्ताने काही रस्ते एका रात्रीत चकाचक करण्यात आले होते. त्यामुळे यावर्षी खड्ड्यांचा त्रास तेवढा होणार नाही, अशी आशा आहे. ज्या ठिकाणी रस्त्याची कामे झाली आहेत, ते सर्व रस्ते सुस्थितीत आहेत का, याची महापालिकेने पावसाळ्यापूर्वीच तपासणी करायला हवी. देखभाल दुरुस्तीसाठी ४२ कोटी रुपयांची निविदा काढली असून दोन आठवड्यांनी ही प्रक्रिया होईल असे रस्ते विभागाने म्हटले आहे, म्हणजे पावसाळा सुरू झाल्यावर कामांना मंजुरी मिळणार असेल तर त्याचा उपयोग काय?

आजही सिमेंट रस्ते तयार करण्याचे तसेच इतर कारणांसाठी रस्ते खोदाई सुरू आहे. कोथरूडमधील अंतर्गत रस्ते, बिबवेवाडी रस्ता, सिंहगड रस्ता, कात्रज कोंढवा रोड अशी अनेक कामे अर्धवट आहेत, ती दहा पंधरा दिवसांत कशी पूर्ण होणार आहेत. या अपूर्ण रस्त्याला पर्याय काय, हे स्पष्ट व्हायला हवे.ड्रेनेज आणि स्ट्रॉम वॉटर लाइनची सफाई झाल्याचे नागरिकांना तरी दिसलेले नाही. पण हे काम ही उत्तम पद्धतीने झाले असेल असे गृहीत धरुयात, कारण त्याचे ऑडिट पहिल्या पावसानंतरच होणार आहे.

ज्या ठिकाणी सिमेंट रस्ते आहेत, तसेच ज्या ठिकाणी मोठे दुभाजक आहेत. तेथे यावर्षी पाणी साठणार नाही याचीही काळजी महापालिकेने घेतली असावी. गेल्या वर्षीची वृत्तपत्र पाहिली तरी हे स्पॉट मिळतील. त्यासाठी पुन्हा पाऊस पडून गरवारे महाविद्यालयाच्या समोर मेट्रो खाली जी परिस्थिती झाली होती तशी व्हायला नको.

त्यामुळे पाणी रस्त्यावर तुंबून वाहतूक ठप्प होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. वाहतूक पोलिसांनी महापालिकेसोबत समन्वय साधून सिग्नल बंद राहणार नाहीत, कोंडी होणार नाही, यासाठी प्रयत्न करायला हवेत. गेल्या दोन-तीन वर्षांच्या अनुभवातून प्रशासकीय यंत्रणा काहीतरी शिकली असेल असे अपेक्षित आहे. नाही तर'नेमेचि येतो मग पावसाळा' असे शब्दशः व्हायला नको.

हे नक्की करा.

  • रस्ते दुरुस्तीची कामे पावसाळ्यापूर्वी करा

  • पाणी तुंबणाऱ्या रस्त्यांची दुरुस्ती

  • खोदलेल्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती

  • वीज, सिग्नल यंत्रणा सुरू राहतील अशी व्यवस्था

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Opening: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजाराची जोरदार सुरुवात; निफ्टी नवीन विक्रमी उच्चांकावर

Covaxin: कोव्हिशिल्डच्या गोंधळानंतर कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेकचा मोठा दावा, वाचा काय म्हणाली कंपनी

Crude Oil Prices: पेट्रोल-डिझेलचे दर होणार कमी! कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये मोठी घट

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

T20 World Cup: टीम इंडियात ४ फिरकी गोलंदाज का घेतले? कर्णधार रोहित शर्माने दिलं स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT