Teacher esakal
पुणे

Teachers Problem : ... तर, आम्ही शाळेवर पोचायचे कसे? शिक्षिकांचा सवाल

आमचं आता वय झाले आहे. कुणी वयाची पन्नाशी ओलांडली तर कुणी ५३ वर्षे पूर्ण केली आहेत.

गजेंद्र बडे

आमचं आता वय झाले आहे. कुणी वयाची पन्नाशी ओलांडली तर कुणी ५३ वर्षे पूर्ण केली आहेत.

पुणे - आमचं आता वय झाले आहे. कुणी वयाची पन्नाशी ओलांडली तर कुणी ५३ वर्षे पूर्ण केली आहेत. या वयात आम्हा शिक्षक-शिक्षिकांपैकी अनेकांना मधुमेह (शुगर), रक्तदाब (बीपी). मणक्यांचे आजार, गुडेघेदुःखी अशा आजारांनी गाठले आहे. अशा वयात स्वतःच्या तालुक्यातील शाळा मिळावी, ही आम्हा सर्वांची माफक अपेक्षा असते. परंतु या वयात आमची आता अतिदुर्गम भागातील शाळांवर बदली केली आहे. यापैकी काही शाळांना बारा महिने किमान एक तास बोटीतून आणि त्यानंतर किमान दीड ते दोन तास डोंगरदऱ्या आणि निर्जन भागातून पायपीट करत शाळांवर जावे लागणार आहे. या वयात आम्ही अशा निर्जनस्थळी असलेल्या शाळांवर पोचायचे कसे? असा सवाल जिल्ह्यातील वयाची पन्नाशी ओलांडलेल्या पावणेतीनशे शिक्षकांनी केला आहे.

माझी बदली मुळशी तालुक्यातील भोरदेव शाळेवर झाली आहे. या शाळेचे अंतर माझ्या गावापासून पावणेदोनशे किलोमीटर आहे. शिवाय या शाळेवर पोचण्यासाठी पहिल्यांदा बोटीतून एक तास प्रवास करावा लागतो. त्यानंतर निर्जन आणि अतिदुर्गम डोंगर-दऱ्यांमधून दोन तास पायपीट करावी लागते. मध्येच साप, हिंस्र प्राण्यांचा सामना करावा लागतो. शाळेवर मनुष्यवस्तीही कमी. त्यामुळे शाळेच्या आसपास निवासाची सोयही करता येत नाही. अशा या निर्जन भागातील शाळेवर मी पोचू शकत नसल्याचे दौंड तालुक्यातील भागवतवाडी शाळेवर असलेल्या उपशिक्षिका खुदेजा तैमूर शेख सांगत होत्या. अशा दुर्गम शाळांवर आमच्यासारख्या पन्नाशी ओलांडलेल्या शिक्षकांऐवजी नव्याने नियुक्त होणाऱ्या शिक्षकांची नियुक्ती केली पाहिजे. जेणेकरून त्यांना कौशल्य दाखविण्याची संधीही मिळू शकेल, अशी मागणीही खुदेजा शेख यांनी केली आहे.

अशीच प्रतिक्रिया बारामती तालुक्यातून मुळशी तालुक्यात बदली झालेल्या एका शिक्षिकेने नाव न छापण्याच्या अटीवर दिली आहे. त्या म्हणाल्या, ‘‘बदल्यांच्या सहाव्या फेरीत मला मुळशी तालुक्यातील अतिदुर्गम शाळा मिळाली आहे. सध्याच्या शाळेपासून नव्या शाळेचे अंतर हे १५५ किलोमीटर आहे. नव्या शाळेवर जाण्यासाठी दळववळणांची सुविधा नाही. शाळेजवळ राहण्याची सोय नाही. त्यामुळे आम्हा शिक्षिकांवर या बदल्यांनी मोठा अन्याय केला आहे.’’

याआधी २०१६ मध्ये मी वेल्हे तालुक्यातील मार्गासनी येथे दोन वर्षे काम केले आहे. ही शाळा पूर्वी अवघड क्षेत्रातील होती. मात्र अतिदुर्गम भागात असलेली ही शाळा मध्येच ती सुगम झाली आणि या शाळेच्या शेजारी अगदी रस्त्यालगत असलेली सुगम शाळा दुर्गम झाली. यामुळे माझी बदली झाली आणि या शाळेवरील नियुक्ती ही सुगम शाळेवरील ग्राह्य धरल्याने, यंदा परत माझी बदली वेल्हे तालुक्यातील अतिदुर्गम भागात झाली असल्याचे बारामती तालुका एकल शिक्षक संघटनेचे अघ्यक्ष दत्ता भोसले सांगत होते.

जिल्ह्यातील २७४ शिक्षकांची कुटुंबे विस्कळित

शिक्षकांच्या बदल्यांच्या सहाव्या फेरीत २७४ शिक्षकांच्या बदल्या या अतिदुर्गम भागातील शाळांवर झाल्या आहेत. यापैकी १७४ उपशिक्षक आणि १०० पदवीधर शिक्षक आहेत. वयाची ५३ वर्षे पूर्ण केलेल्या शिक्षकांना बदली प्रक्रियेतून वगळण्यात येत असले तरी या २७४ पैकी ५५ शिक्षक हे वयाची ५३ वर्ष पूर्ण केलेली आहेत. वयाच्या सीमारेषा निश्‍चित करण्यासाठी ३० जून २०२२ अशी डेडलाईन ग्राह्य धरण्यात आल्याने ही नवी समस्या पुढे आली आहे. याशिवाय अतिदुर्गम भागात बदली झालेल्यांमध्ये १५३ शिक्षिकांचा समावेश आहे. परिणामी या बदल्यांमुळे जिल्ह्यातील २७४ शिक्षकांची कुटुंबे विस्कळित झाली असल्याचे जयश्री कुंजीर, मनीषा मटाले, कल्पना कुंजीर, मनीषा मारणे, आशा कुंजीर, योजना मंगुडकर, पल्लवी पवार आदी शिक्षिकांनी सांगितले.

सहाव्या टप्प्यातील बदल्या रद्दची मागणी

आता आम्ही सर्वांनी वयाची पन्नाशी ओलांडली आहे. त्यामुळे हे वय म्हणजे आमच्या सेवेचा अंतिम टप्पा आहे. अशा सेवेच्या अंतिम टप्प्यात आम्हाला कुटुंबापासून दूर राहण्यासाठी बदल्यांचे नवे धोरण कारणीभूत ठरू लागले आहे. वयोमानामुळे अनेकांना विविध शारीरिक आजारांनी ग्रासले आहे. आईवडिलांची सेवा,कौटुंबिक जबाबदाऱ्या या आणि अशा विविध बाबींचा विचार करून आम्हा सर्वांना स्वतःच्या तालुक्यातील शाळेवर नियुक्ती मिळणे गरजेचे आहे. विशेषतः महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनेही अनोळखी, अतिदुर्गम ठिकाणी नेमणूक देताना महिलांना प्राधान्याने वगळणे आवश्यक आहे. त्यामुळे गंभीर आजार आणि पन्नाशी ओलांडलेल्या सर्व शिक्षकांच्या या बदल्या रद्द कराव्यात, अशी मागणी शिक्षकनेते रोहिदास मेमाणे, सुधीर मेमाणे, बाळकृष्ण रणदिवे आदींसह सर्व शिक्षिकांनी केली आहे.

माझ्यासह अनेक शिक्षकांचे वय ५३ वर्षे पूर्ण झाले आहे. तरीसुद्धा माझ्यासारख्या संवर्ग एकमधील महिलांना अतिदुर्गम भागात या वयात पाठवून आमच्यावर अन्याय केला आहे. केवळ अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरण्यासाठी जवळ असणाऱ्या पती-पत्नींची १०० ते १५० किलोमीटर अंतरावर बदली केली आहे. त्यामुळे सरकारने बदलीचा ६ वा टप्पा रद्द केला पाहिजे.

- सुनीता साबळे, पुरंदर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : लाजीरवाण्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक संतापला; जसप्रीत बुमराहसह बघा कोणाकोणावर खापर फोडलं, वैभव सूर्यवंशीबाबत म्हणाला...

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

SCROLL FOR NEXT