दहशतवादावर दुटप्पी राहू नका
राजनाथसिंह यांची शांघाय सहकार्य परिषदेत सडेतोड भूमिका
बिश्केक, ता. २८ (पीटीआय) : शांघाय सहकार्य परिषदेने (एससीओ) एखाद्या देशाकडून पुरस्कृत केल्या जाणाऱ्या दहशतवादाच्या धोक्याकडे दुर्लक्ष करू नये. या समस्येचा सामना करताना दुटप्पी असू नये, अशी सडेतोड भूमिका संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी मांडली. पाकिस्तानकडून पोसण्यात येणाऱ्या दहशतवादाच्या अनुषंगाने राजनाथसिंह यांनी ही भूमिका मांडली आहे.
शांघाय सहकार्य परिषदेची बिश्केक येथे परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये राजनाथसिंह म्हणाले, ‘‘दहशतवाद्यांचे अड्डे आता कठोर शिक्षेपासून दूर राहिलेले नाहीत, हे भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’मधील कणखर भूमिकेतून दाखवून दिले आहे. एखाद्या देशाच्या सार्वभौमत्वावर थेट हल्ला करणाऱ्या सरकारपुरस्कृत दहशतवादाकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही. या ठिकाणी दुटप्पीपणाला थारा नाही. दहशतवादांना प्रोत्साहन देणाऱ्या, आसरा देणाऱ्या आणि सुरक्षित परिस्थिती निर्माण करणाऱ्या देशांविरोधात योग्य कारवाई करणे गरजेचे आहे.’’
दहशतवादाचा सामना करण्यासाठी जागतिक स्तरावर एकत्रित प्रयत्न करण्याची गरज व्यक्त करताना राजनाथसिंह म्हणाले, ‘‘आम्हीही दहशतवादी विचारसरणी, मूलतत्त्ववाद आणि दहशतवाद यांसारख्या वाढत्या आव्हानांचा सामना करत आहोत. उदयोन्मुख जागतिक व्यवस्थेसाठी दहशतवाद हा सर्वांत मोठा दहशतवाद झाला आहे. याच पार्श्वभूमीवर, ‘एससीओ’ ही सामायिक मूल्यांवर आधारित संघटना उदयास आली आहे. दहशतवादाविरुद्धच्या या लढ्यात ‘एससीओ’ने या कारवाया व विचारसरणीचा तीव्र निषेध केला आहे.’’ त्यांनी सध्याच्या भूराजकीय घडामोडींवरही भाष्य केले. वाढता एककल्लीपणा आणि संघर्ष यांवर आवर घालण्याची गरज असून, काही वर्षांतील संघर्षामुळे हजारो जणांचा जीव व मालमत्तेचे नुकसान झाले आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.