केडगाव (पुणे) : हातवळण (ता. दौंड) येथील रस्त्याची उंची कधी वाढणार, या प्रतीक्षेत तेथील ग्रामस्थ आहेत. गेली 25 वर्षे हा प्रश्न प्रलंबित आहे. पुराच्या पाण्यात रस्त्याचे आश्वासन वाहून जाते की काय, असा प्रश्न येथील ग्रामस्थांना पडला आहे.
हातवळण येथे 1997 ला मोठा पूर आल्याने येथील ग्रामस्थांना लष्करी मदत घेत बाहेर पडावे लागले. त्यानंतर 2006 मध्ये तीच परिस्थिती. 2019 मध्ये पुराच्या पाण्याने गावाला वेढा घातला आणि गावाचा तालुका व जिल्ह्याशी संपर्क तुटला. गावात जाण्यासाठी एकमेव रस्ता आहे. विसर्ग वाढल्यानंतर हा रस्ता पाण्याखाली जातो. गावातही पाणी शिरते. रस्ता पाण्याखाली गेल्यामुळे ग्रामस्थांना गावाबाहेर पडता येत नाही. एका छोट्या पुलाअभावी व अवघ्या 500 मीटर लांबीच्या रस्त्याची उंची न वाढविल्यामुळे हा सगळा त्रास ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी या गावाला रविवारी भेट दिली, तेव्हा ग्रामस्थांनी तेच गाऱ्हाणे गायले. सुळे यांनी या कामात लक्ष घालण्याचे आश्वासन दिले आहे. आमदार राहुल कुल यांनी या कामात लक्ष घालण्याची मागणी हातवळणचे माजी सरपंच व कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सागर फडके यांनी केली आहे. फडके यांनी सुळे यांना रस्त्याची उंची वाढविण्यासंदर्भात निवेदन दिले. सुप्रिया सुळे यांनी रविवारी हातवळण, नानगाव, पारगाव या नदीकाठच्या गावांना भेट देऊन पूरपरिस्थितीची पाहणी केली. राज्य सरकारकडे बाधित शेतकऱ्यांना व नागरिकांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी पारगाव येथे सांगितले.
गावाला पडतो पुराचा वेढा
भीमा नदीकाठी हातवळण गाव वसलेले आहे. धरणक्षेत्रात मोठा पाऊस झाला की नदीला पूर येतो. पूर आला की गावाच्या तीनही बाजूला पाणी असते. नदीतील विसर्ग दीड लाख क्युसेकच्यावर गेला की गावाला पुराचा वेढा पडतो. अधिकारी- नेतेमंडळी येतात, भेट देतात, आश्वासन देतात, निघून जातात. गेली 25 वर्षे प्रश्न आहे तेथेच आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.