साकळाई योजनेसाठी
९६७ कोटी रुपयांची निविदा
बत्तीस जिरायती गावांना पाणी मिळण्याच्या आशा उंचावल्या
ॲग्रोवन वृत्तसेवा
अहिल्यानगर : अहिल्यानगर व श्रीगोंदा तालुक्यांतील ३२ जिरायती गावांसाठी सत्तर वर्षांपासून बहुचर्चित, प्रस्तावित असलेल्या साकळाई उपसा पाणी सिंचन योजनेसाठी अखेर ९६७ कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध झाली आहे. त्यामुळे दोन्ही तालुक्यांतील बारा हजार हेक्टर जिरायती क्षेत्राला पाणी मिळण्याच्या आशा उंचावल्या आहेत. माजी खासदार डाॅ. सुजय विखे पाटील यांनी यासाठी पाठपुरावा केला.
अहिल्यानगर व श्रीगोंदे तालुक्यांतील चिखली, कोरेगाव, घोसपुरी, सारोळा कासार, खडकी, जाधववाडी, वाळकी, शिरढोण, हिवरे झरे, बाबुर्डी बेंड, दहीगाव, साकत, वाटेफळ, देऊळगाव सिद्धी, तांदळी, बडगाव, रुई छत्तीसी, आंबिलवाडी, गुणवडी, गुंडेगाव, राळेगण, मांडवगण, मठ पिंप्री, हातवळण, खांडगाव, महांडूळवाडी, कोळगाव, सुरेगाव, घुटेवाडी, कोतुळ, बांगर्डा आणि कामठी या बत्तीस गावांचा जिरायती भाग आहे. या परिसराला कुकडी प्रकल्पातील पाणी मिळावे साठी साकळाई उपसा सिंचन करण्याचे नियोजन केले. त्यासाठी १९५४ मध्ये घोड धरणासाठी केंद्रीय जल आयोगाने १०.४० टीएमसी पाणी साठ्याला मंजुरी दिली होती. मात्र प्रत्यक्षात धरणाची क्षमता ७.४० टीएमसी इतकी बांधण्यात आली. परिणामी, दरवर्षी सुमारे तीन ते चार टीएमसी पाणी ओव्हरफ्लोच्या स्वरूपात वाहून जाते. या अतिरिक्त पाण्यापैकी १.८० टीएमसी पाणी साकळाई योजनेसाठी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव आहे. अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर साकळाई उपसा सिंचन योजनेच्या कामाला गती मिळू लागल्याचे दिसत आहे. योजनेला मंजुरी मिळाल्यानंतर कामासाठीची ९६७ कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध झाली आहे. या योजनेमुळे अहिल्यानगर आणि श्रीगोंदा तालुक्यांतील ३२ जिरायती गावांमधील सुमारे १२ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येईल. वनविभागासह अन्य संबंधित विभागांच्या आवश्यक मान्यतांसाठीही मागील महिन्यात टेंडर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पुढील दोन ते तीन महिन्यांत टेंडर प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे. टेंडर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दिवाळीच्या काळात कामाला सुरवात होण्याची शक्यता आहे. या योजनेमुळे सुमारे १२ हजारांपेक्षा अधिक जिरायती क्षेत्राला मदत होईल.
कोट ---
अहिल्यानगर व श्रीगोंदे तालुक्यांतील ३२ दुष्काळी भागातील शेतीला साकळाई उपसा सिंचन योजनेमुळे शाश्वत पाण्याचा आधार मिळण्याबरोबरच शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीतही बदल होईल. या सिंचन योजनेच्या कामासाठी निविदा प्रसिद्ध झाल्याने योजनेने आता प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या दिशेने पाऊल टाकले आहे. लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन कामाला सुरुवात होईल.
- डाॅ. सुजय विखे पाटील, माजी खासदार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.