आळंदी, ता. २७ : संत ज्ञानेश्वर माउलींचा जन्मोत्सव आणि कृष्ण जन्माष्टमीनिमित्त आळंदी देवस्थानच्यावतीने माउलींच्या संजीवन समाधी मंदिरामध्ये शनिवार (ता. २९) ते शनिवार (ता. ५) पर्यंत हरिनाम सप्ताह आयोजित केला आहे. या निमित्ताने आळंदीकर भाविकांना नामवंत कीर्तनकारांची कीर्तने-प्रवचने श्रवण करण्याचा लाभ मिळणार आहे. शुक्रवारी (ता. ४) संत ज्ञानेश्वर माउलींचा जन्मोत्सव आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाणार असून, गोपाळकाला शनिवारी (ता. ५) काल्याच्या कीर्तनाने होणार आहे.
माउलींचा जन्मोत्सव आणि श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त होणाऱ्या हरिनाम सप्ताहामध्ये दररोज दुपारी चार ते सायंकाळी पाच या वेळेत प्रवचन आणि रात्री साडेसहा ते साडेआठ कीर्तनाचे कार्यक्रम होणार आहेत. कार्यक्रमाचा प्रारंभ शनिवारी (ता. २९) होणार आहे. चैतन्य महाराज कबीर, उमेश महाराज दशरथे, विवेक महाराज रामदासी, चंद्रकांत महाराज वांजळे, यशोधन महाराज साखरे, प्रमोद महाराज जगताप, योगी निरंजननाथ यांची प्रवचने होतील.
बडवे महाराज, पुरुषोत्तम महाराज पाटील, देहूकर महाराज संस्थान, बाळासाहेब शेवाळे, जोग महाराज संस्थान, माधव महाराज रामदास, भावार्थ देखणे यांची कीर्तने होणार आहेत. शनिवारी (ता. ५) सकाळी नऊ ते अकरा बापूसाहेब मोरे देहूकर यांचे काल्याचे कीर्तन आणि हरिनाम सप्ताहाची सांगता होणार आहे. दरम्यानच्या काळात दररोज रात्री आळंदीकर ग्रामस्थांचे भजन होणार आहे. तर माउली जन्मोत्सवानिमित्त दररोज अन्नप्रसादाचा कार्यक्रम असणार आहे.