सिंधुदुर्गात पावसाचा जोर कायम
अनेक भागात पडझडीचे प्रकार, शेती कामाला गती
सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी ः सिंधुदुर्गात पावसाचा जोर कायम असून, मंगळवारी रात्री जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. बुधवार (ता.२४) सकाळपासून देखील पावसाच्या सरीवर सरी सुरू आहेत. पावसामुळे काही भागांत पडझडीचे प्रकार झाले आहेत.काही भागात वीजपुरवठा देखील खंडीत आहे. जिल्ह्यात शेतीकामांना वेग आला आहे.
जिल्ह्यात सोमवारी (ता.२२) रात्री आणि मंगळवारी दिवसभर मुसळधार पाऊस झाल्यानतंर रात्री देखील पावसाच्या सरीवर सरी सुरू होत्या. या पावसामुळे सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्यांच्या काही भागात झाडे वीजवाहिन्यांवर उन्मळून पडली. त्यामुळे वीजप्रवाह खंडित झाला.काही ठिकाणी वाहतुक देखील विस्कळीत झाली. जिल्ह्यातील वैभववाडी, सावंतवाडी, कणकवली, दोडामार्ग तालुक्यांत मुसळधार पाऊस झाला, तर अन्य तालुक्यात देखील पावसाचा जोर आहे. या पावसामुळे आतापर्यंत कोरडे पडलेले नदीनाले प्रवाहीत झाले आहेत. शेतीकामांना देखील वेग आला आहे. रखडलेल्या नांगरणीला शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे.
सिंधुदुर्गात दोन आँरेज अलर्ट
जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने २५ आणि २६ रोजी आँरेज अलर्ट जाहीर केला आहे. या कालावधीत जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज दिला असून, ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहणार असल्याची शक्यता देखील आहे.
तालुकानिहाय पाऊस (मिमी)
देवगड २७, मालवण ४४, सावंतवाडी ६७, वेंगुर्ला ५१ , कणकवली ८२, कुडाळ ६०, वैभववाडी ८५, दोडामार्ग ७३,