KPG26B10561
राजेंद्र सोनवणे
आंदोलनाकडे नागरिकांची पाठ ः सोनवणे
कोपरगाव, ता. १९ ः शहरात मोकाट जनावरांचा वावर वाढला आहे. त्यावर कोपरगाव नगरपरिषद आणि गोप्रेमी त्यांना पकडण्यासाठी प्रयत्न करत आहे. एकाच दिवसात ३३ जनावरे पकडण्यात यश मिळाले आहे. काळे गटाने नगरपरिषदेच्या विरोधात मोर्चा काढला. मात्र त्याला अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याने त्यांच्या राजकारणाला नागरिकांनी झुगारले आहे, अशी प्रतिक्रिया माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांनी दिली.
ते म्हणाले की, काही दिवसांपूर्वी अपघातात दोन नागरिकांचा मृत्यू झाला. त्यांना श्रद्धांजली अर्पण करणाऱ्या फलकांचे देखील राजकारण आमदार आशुतोष काळे यांच्याकडून झाल्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त झाला. प्रशासक काळात काळे यांच्याकडे सर्वाधिकार असताना मोकाट जनावरांचा बंदोबस्त त्यांना करता आला नाही. वारंवार विविध संघटनांनी मागणी केली होती, तरीही त्यावर कारवाई न करता मृत जनावरांच्या नावाखाली अव्वाच्या सव्वा बिले त्या काळात निघाली व त्याबाबत गैरप्रकाराचे आरोप देखील यापूर्वी झालेले आहेत. नगरपरिषद गोप्रेमींच्या मदतीने गोशाळा निर्माण करत आहे. काळे यांनी जनआक्रोश असे भासवत नागरिकांना मोर्चात येण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. पण नागरिकांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली. नगरपरिषदेने पकडलेली जनावरे बाजारभावाच्या ५० टक्के पावती फाडल्यानंतरच मालकाला परत मिळतील, अशी भूमिका नगराध्यक्ष पराग संधान यांनी यापूर्वीच मांडली होती. मुळात कुणाच्याही मृत्यूचे भांडवल करून अशा स्वरूपाचे राजकारण करणे हे शोभा देणारे नाही, अशी टीकाही सोनवणे यांनी केली.