१७१ कारखान्यांकडून
पूर्ण ‘एफआरपी’ अदा
साखरेच्या दरवाढीमुळे थकीत बिले देण्यात गती
राजकुमार चौगुले : ॲग्रोवन वृत्तसेवा
कोल्हापूर : राज्यात २०२५-२६ गळीत हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देय असलेल्या एफआरपीपैकी ९९.३७ टक्के रक्कम अदा करण्यात आली असून, अद्याप २५६ कोटी रुपयांची एफआरपी थकबाकी शिल्लक आहे. साखर आयुक्तालयाने ३१ जुलै २०२६ अखेर प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीत ही माहिती देण्यात आली आहे.
राज्यात २०२५-२६ च्या गळीत हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देय असलेल्या एफआरपीपैकी ९९.३७ टक्के रक्कम अदा करण्यात आली आहे. अद्याप २५६ कोटी रुपयांची एफआरपी थकबाकी शिल्लक असून, साखर आयुक्तालयाने ३१ जुलै २०२६ अखेर प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीत ही माहिती देण्यात आली आहे.
आकडेवारीनुसार, राज्यातील २१० साखर कारखान्यांनी गळीत हंगामात सहभाग घेतला. या कारखान्यांनी मिळून १,०४५.६३ लाख टन ऊस गाळप केला. या उसासाठी तोडणी व वाहतूक खर्चासह ४०,४४६ कोटी रुपये इतकी एकूण एफआरपी देय होती. तर हा खर्च वगळता ही रक्कम ३०,२७८ कोटी रुपये होती.
कारखान्यांनी तोडणी व वाहतूक खर्चासह ४१,५६८ कोटी रुपये, तर हा खर्च वगळता ३१,३९९ कोटी रुपये अदा केले आहेत. त्यामुळे देय रकमेच्या तुलनेत अनुक्रमे १०२.७७ टक्के आणि १०३.७० टक्के रक्कम वितरित झाली आहे. काही कारखान्यांनी मूलभूत एफआरपीपेक्षा अधिक दराने ऊसबिले दिल्यामुळे ही टक्केवारी १०० पेक्षा जास्त झाली आहे.
प्रत्यक्ष अदा केलेली एफआरपी तोडणी व वाहतूक खर्चासह ४०,१९० कोटी रुपये असून, प्रत्यक्ष थकबाकी २५६ कोटी रुपये आहे. त्यामुळे प्रत्यक्ष एफआरपी अदा करण्याचे प्रमाण ९९.३७ टक्के इतके झाले आहे.
३९ कारखान्यांकडे
काही रक्कम थकीत
राज्यातील १७१ कारखान्यांनी शेतकऱ्यांची १०० टक्के एफआरपी अदा केली आहे. ३४ कारखान्यांनी ८० ते ९९.९९ टक्के, दोन कारखान्यांनी ६० ते ७९.९९ टक्के, तर तीन कारखान्यांनी ६० टक्क्यांपेक्षा कमी एफआरपी अदा केली आहे. एकूण ३९ कारखान्यांकडे एफआरपीची काही रक्कम थकीत असून, त्यापैकी १० कारखान्यांविरोधात महसूल वसुली प्रमाणपत्र (आरआरसी) जारी करण्यात आले आहे. राज्यातील उर्वरित कारखान्यांनी शेतकऱ्यांची देयके वेळेत अदा केल्याचे या अहवालातून स्पष्ट झाले आहे.
‘थकीत रक्कम
वेगाने देणे सुरू’
गेल्या पंधरा दिवसांपासून स्थानिक बाजारात साखरेचे दर सातत्याने चार हजार रुपयांच्या आसपास आहेत. ज्या साखर कारखान्यांकडे काही प्रमाणात साखरेचा साठा शिल्लक आहे, त्यांना त्याचा फायदा झाला आहे. साखर विक्रीतून चांगली रक्कम मिळत असल्याने कारखान्यांनी एफआरपीची देयके अदा करण्यास गती दिली आहे. त्यामुळे एफआरपीची थकीत रक्कम वेगाने अदा होत असल्याचे कारखाना प्रतिनिधींनी सांगितले.