सुरूपखानवाडीतील विवाहितेच्या अपहरणाचा बनाव उघड
दहिवडी, ता. २७ : सासरचे लोक माहेरी पाठवत नसल्याच्या रागातून चुलत दिराच्या मदतीने स्वतःच्या अपहरणाचा बनाव रचणाऱ्या विवाहितेचा दहिवडी पोलिसांनी अवघ्या चार तासांत शोध घेऊन या संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे.
सुरूपखानवाडी (ता. माण) येथील निकिता चंद्रकांत गलांडे (वय २६) ही महिला शेतात गुरांना चारा टाकण्यासाठी गेली असता, काळ्या रंगाच्या गाडीतून आलेल्या अज्ञात व्यक्तींनी तिचे अपहरण केल्याची माहिती तिच्या पतीने व सासरच्यांनी दहिवडी पोलिसांत दिली. निकिताच्या अल्पवयीन चुलत दिरानेही पोलिसांना गाडीतून अपहरणाची खोटी कहाणी सांगितली.
घटनेचे गांभीर्य ओळखून सहाय्यक पोलिस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी आणि त्यांच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाची पाहणी करत असताना घटनास्थळावरील टायरचे ठसे, रस्त्याची परिस्थिती आणि अल्पवयीन दिराचा जबाब यात तफावत आढळल्याने पोलिसांना संशय आला, तसेच गावातील खबऱ्यांनी निकिता हिला तिचा चुलत दीरच दुचाकीवरून महिमानगडच्या दिशेने घेऊन गेल्याची माहिती दिली. त्यामुळे पोलिसांनी दिराला विश्वासात घेऊन चौकशी केली असता, त्याने वहिनीच्या सांगण्यावरून तिला महिमानगड बस थांब्यावर सोडल्याचे कबूल केले.
तपासाची चक्रे फिरवत पोलिसांनी निकिताच्या माहेरी (बिबवी, ता. जावळी) संपर्क साधला असता ती तिथे सुखरूप पोहोचल्याचे समोर आले. सासरचे लोक माहेरी जाऊ देत नसल्याने पोलिसांना आणि घरच्यांना चकवा देण्यासाठी हा अपहरणाचा बनाव रचला होता, अशी कबुली निकिताने दिली. सहाय्यक पोलिस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी, पोलिस हवालदार सचिन जगताप व रवींद्र खाडे, पोलिस शिपाई अजिनाथ नरबट, नीलेश कुदळे, महेंद्र खाडे, असिफ नदाफ, गणेश खाडे, अजित भोसले व ओंकार साळुंखे यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.
--------------