तंत्रज्ञानाशिवाय कृषी क्षेत्राला पर्याय नाही
नितीन कापसे; दहिवडी काॅलेजमध्ये कार्यशाळा उत्साहात
दहिवडी, ता. ३ : शेतीला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली, तरच शेतीची उत्पादकता वाढून एकूण उत्पादनात वाढ होते. तंत्रज्ञानाच्या मदतीने उत्पादन आणि उत्पन्न यांचा मेळ बसवून आर्थिक उन्नती साधता येते. त्यासाठी शेती करताना प्रगत तंत्रज्ञानाला प्राधान्य द्या, असे आवाहन कृषिनिष्ठ पुरस्कार प्राप्त शेतकरी नितीन कापसे यांनी व्यक्त केले.
दहिवडी कॉलेज येथे आयोजित ॲग्री बिझनेस स्टार्टअप फ्रॉम फॉर्म टू मार्केट या एक दिवसीय कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी प्राचार्य डॉ. सुनील हेळकर, उपप्राचार्या डॉ. मीरा देठे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व पीएम- उपसमन्वयक प्रा. डॉ. सुधीर कुंभार, एलबीआय समन्वयक प्रा. डॉ. मारुती लुबाळ, वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. डॉ. नीलेश म्हेत्रे उपस्थित होते.
श्री. कापसे म्हणाले, ‘‘पावसाचा लहरीपणा, बदलणारे पर्यावरण, माणसाच्या बदलणाऱ्या व वाढत्या गरजा पूर्ण करत असताना शेतीत कष्टासोबत तंत्रज्ञानही तितकेच महत्त्वाचे आहे. जो कष्टाला तंत्रज्ञानाची जोड देईल, तो यशस्वी शेतकरी म्हणून नावारूपाला येईल.’’
प्राचार्य डॉ. हेळकर म्हणाले, ‘‘नितीन कापसे यांनी सोलापूर जिल्ह्यात द्राक्ष उत्पादनात खूप मोठे काम केले आहे. त्यांनी द्राक्ष शेतीत नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन करून कृषी क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे, म्हणून त्यांना महाराष्ट्र शासनाने कृषिनिष्ठ पुरस्कार देऊन गौरविले आहे.’’
प्रा. डॉ. म्हेत्रे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. सोमनाथ गायकवाड यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रा. कांचन गुळीक यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. शुभम चौरसिया यांनी आभार मानले. कार्यक्रमास प्रा. योगिता वसव, प्रा. अस्मा शेख, प्रा. शिल्पा जाधव, प्रा. नेहा गायकवाड व विद्यार्थी उपस्थित होते.
............
B07330
दहिवडी : कार्यशाळेत बाेलताना नितीन कापसे. त्या वेळी डॉ. सुनील हेळकर आदी.
...........................................