नारायणगाव, ता. २ : गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर तमाशा करार करण्यासाठी आज येथील तमाशा पंढरीतील राहुट्यांमध्ये पुणे, नगर, कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यातील यात्रा समितीचे पदाधिकारी, सरपंच व फडमालक यांच्यात बैठका रंगल्या होत्या. पाडव्याच्या मुहूर्तावर आज बत्तीस फडमालकांचे दीडशे करार झाले. या माध्यमातून सुमारे दोन कोटी रुपयांची उलाढाल झाली. तमाशा पंढरीत मागील महिनाभरात सुमारे सातशे करार होऊन सुमारे आठ कोटी रुपयांची उलाढाल झाली. मागील पाच वर्षातील ही विक्रमी उलाढाल आहे, अशी माहिती तमाशा पंढरीचे अध्यक्ष व फडमालक आविष्कार मुळे, मुसभाई इनामदार यांनी दिली.
कोरोनामुळे मागील दोन वर्षे यात्रा बंद असल्याने तमाशाचे कार्यक्रम न झाल्याने फडमालक, कलावंत यांची आर्थिक कोंडी झाली होती. मात्र, शासनाने गावोगावच्या यात्रा, जत्रा, उत्सव या निमित्ताने होणाऱ्या बैलगाडा शर्यती व तमाशा कार्यक्रमाला परवानगी दिल्याने या वर्षी जत्रा- उत्सव धुमधडाक्यात साजरे करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतल्याने तमाशा कार्यक्रमाला मागणी वाढल्याचे चित्र आज येथील तमाशा पंढरीत दिसून आले. या मुळे फडमालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
पाडव्याच्या मुहूर्तावर तमाशा करार करण्याची गेल्या अनेक वर्षांची परंपरा आहे. फडमालकांनी आज सकाळीच पंखे बसवून, गाद्या, तक्के लावून बैठकीसाठी राहुट्या सज्ज ठेवल्या होत्या. राहुट्यांसमोर गुढी उभारण्यात आल्या होत्या.
तमाशाचे हंगामी व तंबूचे असे दोन प्रकार आहेत. हंगामी फडमालकांच्या तुलनेत तंबूच्या फडमालकांचा वाहने, कलावंत, नृत्यांगना, गायक, वादक आदींचा ताफा जास्त असतो. यामुळे मोठया गावांतून तंबूच्या तमाशाला जास्त मागणी असते. या वर्षी मोठा ताफा असलेल्या तंबूच्या तमाशाचे करार हजेरीसह दोन लाख ते चार लाख रुपयांच्या दरम्यान तर हंगामी तमाशाचे करार एक लाख ते दोन लाख रुपयांच्या दरम्यान झाले. या वर्षी पाडवा (२ एप्रिल) ते बुद्ध जयंती (१६ मे) दरम्यान ४५ दिवसांचा यात्रा हंगाम आहे. आज अखेर रघुवीर खेडकर, विठाबाई नारायणगावकर, मालती इनामदार, मंगला बनसोडे, पांडुरंग मुळे सह तुकाराम खेडकर आदी नामांकित फडमालकांचे पस्तीस ते चाळीस तर हंगामी फडमालकांचे दहा ते वीस करार झाले आहेत.
करार करण्याची पद्धत व बिदागी
यात्रा समितीचे पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच येथील राहुट्यांना भेट देऊन फडमालक किंवा प्रतिनिधी सोबत बैठक घेतात. या वेळी गाड्यांचा ताफा, रंगबाजी, गाणी, गायक, नृत्यांगना व कलावंत संख्या, वगनाट्य सोंगाड्या आदींची माहिती घेऊन ग्रामस्थ लेखी करार करतात. याला सुपारी ठरली असे म्हणतात. या वेळी काही रक्कम (बिदागी) फडमालकांना रोखीने देतात. उर्वरित रक्कम कार्यक्रम झाल्यानंतर दिली जाते. करारामध्ये तमाशा कार्यक्रमाची वेळ, दिनांक, रक्कम, जेवणाचा खर्च (शिधा) , नृत्यांगना व कलावंत यांची सुरक्षितता, हुल्लडबाजी किंवा अन्य कारणामुळे खेळ रद्द झाल्यास कराराची सर्व रक्कम देण्याची जबाबदारी आदींचा उल्लेख असतो.
डिझेल, पेट्रोल, टोलच्या दारात मोठी वाढ झाली आहे. महागाई वाढली आहे. तमाशाचा एक कार्यक्रम करण्यासाठी किमान एक लाख रुपये खर्च होतो. टोलमधून मुक्त करावे, इंधन रास्त दारात मिळावे, अशी गेल्या अनेक वर्षांची फडमालकांची मागणी आहे. या वर्षी करार मोठ्या प्रमाणात झाल्याने मागील दोन वर्षात झालेली उधारी देणे शक्य होणार आहे.
-आविष्कार मुळे, फडमालक, पांडुरंग मुळे सह तुकाराम खेडकर
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.