आळंदी, ता. १६ : आषाढ वारीसाठी धर्मशाळेमध्ये वारकऱ्यांची संख्या वाढल्याने तसेच फिरत्या शौचालयांसाठी पाण्याची मागणी वाढल्याने भामा आसखेड धरणातून दीड एमएलडी पाणी जादा मागविण्यात आले आहे. तर आळंदी शहराचा पाणीपुरवठा दोन दिवसाआड केला जात असून पाण्याची वेळ वाढवून ती सव्वा तास पाणी वितरित केले जाणार आहे. वारीसाठी नगरपरिषदेकडून पाणी, आरोग्य सुविधांच्या कामाची पूर्तता पूर्ण झाली असून वारकऱ्यांना सुविधा देण्यासाठी नगरपरिषद सज्ज झाली आहे. तर वारीत दर्शनबारीसाठी इंद्रायणीवर नव्याने उभारलेला फॅब्रिकेटेड पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
याबाबत मुख्याधिकारी माधव खांडेकर म्हणाले, ‘‘वारकऱ्यांना अधिकाधिक सुविधा देण्यासाठी नगरपरिषदेच्या विभागप्रमुखांना जबाबदारी ठरवून दिली आहे. नगरपरिषदेमध्ये नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. वारी काळात पाण्याचा तुटवडा भासू नये यासाठी भामा आसखेड धरणातून पाणीपुरवठा वाढवून घेतला आहे. इंद्रायणीला पाणी चांगले आहे. मावळ भागात पावसाचे प्रमाण चांगले झाल्याने इंद्रायणीला पाण्याची पातळी वाढली आहे. भाविक तसेच स्थानिक नागरिकांनाही सावधानतेच्या सूचना दिल्या जात आहेत. शहर स्वच्छतेसाठी जादाचे कामगार लावण्यात आले आहे. धर्मशाळा आणि वारकऱ्यांसाठी टॅंकरने पाणीपुरवठा केला जाईल. वारीसाठी जिल्हा परिषदचे सहा आणि पिंपरी चिचवडचे चार टॅंकर आळंदी पालिकेत दाखल झाले आहेत.
भामाआसखेड धरणातून आठ एमएलडी पाणी दिले जाते. वारी काळात सुलभ शौचालय, फिरते शौचालय आणि धर्मशाळांना जादा पाणी लागत आहे. त्यांना दिवसभरात चाळीस टॅंकरने पाणी द्यावे लागत आहे. यामुळे स्थानिक नागरिकांना पाण्याची कमतरता भासू नये यासाठी दीड एमएलडी पाणी वाढवून आता साडे नऊ एमएलडी पाणी भामाआसखेड धरणातून मागणी केली आहे. वारी काळात बंद नळाद्वारे सव्वा तास पाणी सोडण्यात येईल.
- श्रद्धा गर्जे, पाणीपुरवठा विभागप्रमुख
स्वच्छतेसाठी सज्ज
शहरातील कचऱ्याची दररोज सफाई केली जाते. इंद्रायणी घाट, मंदिर परिसरात जादा कर्मचारी लावून सफाई केली जात आहे. स्वच्छतेसाठी चाकण राजगुरुनगरमधील घंटागाडी आणि ट्रॅक्टर मागविले आहेत. आळंदी नगरपरिषदेकडे सध्या दहा घंटागाड्या, तीन कॉम्पॅक्टर, चार ट्रॅक्टर स्वत:चे आहेत. तर कचरा उचलण्यासाठी जिल्हा परिषदेकडून सव्वाशे, आळंदी नगरपरिषदेचे अडीचशे, पिंपरीचिंचवड महापालिकेचे पन्नास जादाचे कर्मचारी दाखल झाले आहेत. यामुळे आरोग्यवारी निर्मलवारी अंतर्गत शहरात रस्त्यांवर कचरा साठणार नाही याची दक्षता घेतली जाईल.
दर्शनबारीसाठी विचार करावा लागणार
मावळ भागात तसेच आळंदी परिसरात पावसाची संततधार सुरू आहे. परिणामी इंद्रायणीच्या पातळीत वाढ होत आहे. सध्या इंद्रायणी दुथडी भरून वाहत आहे. वारी काळात स्कायवॉकवरून दर्शनबारी फॅब्रिकेटेड पुलावरून देऊळवाड्यात नेली जाणार आहे. मात्र पुराचे पाणी वाढल्यास दर्शनबारीसाठी ऐनवेळी वेगळा विचार देवस्थान आणि प्रशासनास करावा लागणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.