बेल्हे, ता. २८ : बांगरवाडी (ता. जुन्नर) परिसरात उन्हाची तीव्रता वाढल्याने ३०० हून अधिक मोरांची पाण्यासाठी वणवण होत आहे. वनविभागाने तातडीने पाणवठे तयार करावेत, तसेच दानशूर संस्थांनी धान्य व पाणी व्यवस्थेसाठी सहकार्य करावे, असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे. बांगरवाडी परिसरात मोरांची संख्या मोठी आहे. मात्र, कडक उन्हाळ्यामुळे नैसर्गिक जलस्रोत आटल्याने हे पक्षी मानवी वस्तीकडे वळत आहेत. दरवर्षी स्थानिक ग्रामस्थ आणि रोटरी क्लबसारख्या संस्था मोरांच्या खाद्याची व पाण्याची सोय करतात. यंदाही ही गरज भासत असून, नारायण सावंत, राजेंद्र कदम, किरण फापाळे, प्रभाकर डोंगरे यांच्यासह ग्रामस्थांनी पुढाकार घेतला आहे. वन्यप्राणी उन्हाने कासावीस होत असल्याने समाजाने मदतीचा हात द्यावा, अशी विनंती सुभाष रोकडे, कृष्णा बांगर व अन्य ग्रामस्थांनी केली आहे.