बारामती, ता. २४ : ‘‘उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनामुळे यंदा बारामती तालुक्यासह पुणे जिल्ह्यातील गावागावांतील ग्रामस्थांनी यंदाच्या यात्रा-जत्रा साध्या पद्धतीने फक्त नैवेद्य दाखवून साजऱ्या कराव्यात,’’ असे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते व राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संदीप बांदल यांनी केले आहे.
बारामतीत मंगळवारी (ता. २४) घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे आवाहन केले. अजित पवार यांनी बारामती तालुक्यासह पुणे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी गेल्या चाळीस वर्षात मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या अकाली मृत्यूने कधीही भरून न येणारी हानी झाली आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी कोणत्याही प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित न करता देवाला नैवेद्य दाखवून यात्रा करावी, असे आवाहन देवकाते व बांदल यांनी या पत्रकार परिषदेदरम्यान केले आहे. दरम्यान, नीरावागज गावामध्ये यात्रेनिमित्त वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेणार असल्याचेही देवकाते यांनी याप्रसंगी जाहीर केले.