हरिदास कड : सकाळ वृत्तसेवा
चाकण, ता. २९ : चाकण शहरातील वाढत्या लोकसंख्येचा आलेख... त्याप्रमाणात होणारा अत्यल्प पाणीपुरवठा... वाढत्या लोकसंख्येला जुन्या ग्रामपंचायत नळ पाणीपुरवठा योजनेचे आताच्या चाकण नगरपरिषद पाणीपुरवठा योजनेचे व एमजेपीचे मिळून दिवसाआड, काही ठिकाणी दोन दिवसांनी एकदा पाणीपुरवठा होत आहे. यामुळे चाकणकरांना टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत.
दररोज साठ लाख लिटर पाणीपुरवठा प्रत्यक्षात शहराला होत आहे. पाणीपुरवठा दुप्पट करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. काहीजणांना खासगी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. त्यातून लाखो रुपयांचा खर्च विविध सोसायट्या तसेच गृहप्रकल्पांना करावा लागत आहे. दरम्यान, भामा नदीवरील जुन्या पाणीपुरवठा योजनेतून दररोज चाळीस लाख लिटर पाणी उचलले जाते . पण तो अपुरा ठरत आहे.
भामा आसखेड धरणातून पुणे, पिंपरी-चिंचवड या मोठ्या शहरासाठी पाणी नेले परंतु जवळच असलेल्या चाकण शहराला धरण साठ्यातून पाणीसाठा राखीव मात्र कमीच आहे. औद्योगीकरणामुळे तसेच वाढत्या लोकसंख्येमुळे चाकणचा पाणीप्रश्न दिवसेंदिवस बिकट होत आहे, अशी भावना नागरिक, व्यावसायिक आणि उद्योजकांची आहे.
५ लाख.......चाकण शहराची लोकसंख्या
६० लिटर......प्रतिव्यक्ती पाण्याची गरज
६० लाख लिटर....दररोज होणारा पाणीपुरवठा
१२० लिटर..... एकूण पाण्याची मागणी
दृष्टिक्षेपात सध्याचा तुटवडा
१२ लाख लिटर.... सध्याची पाणीटंचाई
४ टक्के..... पाणी गळती
१३,००० ....अनधिकृत नळ जोड
यामुळे पाणीपुरवठ्यातील समस्या
१. योजनेचे विद्युत रोहित्र बंद असणे
२. वारंवार वीजपुरवठा बंद असणे
३. विद्युत पंपात तांत्रिक बिघाड
४. खासगी टँकरवर अवलंबून राहण्याचे प्रमाण अधिक
राखीव कोटा
भामा नदीवरील जुनी पाणीपुरवठा योजना .....०.९७ (एमसीएफटी)
भामा आसखेड धरणातून नवीन पाणीपुरवठा योजना...८.६ (एमसीएफटी)
नवीन प्रकल्पाचे काम ५५ टक्केच
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान (राज्यस्तरीय) अंतर्गत चाकण शहर पाणीपुरवठा योजना नवीन प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्या योजनेचे काम वेगात सुरू आहे. नवीन पाणीपुरवठा योजना १५९ कोटी रुपये खर्चाची आहे. या योजनेचे आतापर्यंत ५५ टक्के काम पूर्ण झाले आहे. योजने अंतर्गत सात उंच पाण्याच्या टाक्यांपैकी पाच टाक्यांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. उर्वरित टाक्यांचे काम
प्रगतीपथावर आहे.
- सुमित काळोखे, उपअभियंता, पाणीपुरवठा विभाग
भामा आसखेड धरणाकडून चाकण शहराकडे येणाऱ्या अशुद्ध पाण्याच्या जलवाहिनीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे पुढील ८-९ महिन्यात हे काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. तसेच शहरातील वितरण जलवाहिन्यांचे ६० टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यापैकी काही वितरण वाहिन्यांमधून प्रत्यक्ष पाणीपुरवठा देखील सुरू आहे.
- डॉ. अंकुश जाधव, मुख्याधिकारी, चाकण नगरपरिषद
पुढील ४५ दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा
भामाआसखेड धरणातून भामा नदीत पाणी सोडले जाते. भामा नदीतील बंधारे पाण्याने भरतात. त्या बंधाऱ्याच्या साठलेल्या पाण्यावर चाकणची जुनी पाणीपुरवठा योजना आहे. या योजनेचा पाणीसाठा पुढील ४५ दिवस पुरेल एवढा आहे. नव्या सुधारित पाणीपुरवठा योजनेतून चाकण शहराला दररोज शुद्धीकरण केलेले तीन कोटी तीस लाख लिटर पाणी मिळणार आहे. त्यामुळे प्रतिमाणशी दुप्पट पाणी मिळणार आहे.
यानंतरच चाकणकरांना पाणीपुरवठा
- खराबवाडीत नवीन पाणीपुरवठा योजनेचा शुद्धीकरण प्रकल्प
- साडेपाच लाख, साडेचौदा लाख तसेच अठरा लाख लिटर पाण्याची तीन टाक्यांचे बांधकाम
- चाकणमधील मुख्य टाक्यांपासून पाण्याचे वितरण करण्यासाठी सुमारे शंभर किलोमीटर फिरवले जाणार
- नवीन सुधारित पाणीपुरवठा योजनेचे काम आठ ते नऊ महिन्यात पूर्ण होण्याची अपेक्षा
10402