पळसदेव, ता. ३० : भादलवाडी (ता. इंदापूर) येथील ब्रिटिशकालीन तलावातील काटेरी झाडांवर विणीच्या हंगामासाठी आलेल्या परदेशी पक्ष्यांची घरटी सध्या चिमुकल्यांच्या किलबिलाटाने गजबजली आहेत. येथे आलेल्या चित्रबलाक, करकोचा, राखी बगळ्यांनी पिल्लांना जन्म दिला आहे. परिसरातील काडी-काडी जमा करून थाटलेल्या घरट्यात हे पक्षी आता पिल्लांच्या काळजीपोटी मऊ गवताचा गालीचा तयार करीत आहेत व त्यांची बसण्याची व्यवस्था करत असल्याचे आढळून येत आहे.
कडक उन्हाच्या झळांपासून पिल्लांचे संरक्षण व्हावे यासाठी पंख पसरून त्यांना सावलीची व्यवस्था करत असल्याचे दिसून येत आहे. एकंदरीत हे पक्षी आपल्या पिलांच्या काळजीपोटी मोठे संवेदनशील असल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे. हजारोंच्या संख्येने येथे दाखल झालेल्या चित्रबलाक पक्षांनी काही महिन्यांपूर्वी येथील दाट काटेरी झाडीवर घरटी थाटली आहेत. यामध्ये मादी पक्षाने अंडी उबवून पिल्लांना जन्म दिला आहे. सध्या या घरट्यांमध्ये एक ते तीन संख्येने पिले आढळून येत आहेत. या पिल्लांच्या पखांत बळ येईपर्यंत या पक्ष्यांचा येथे मुक्काम असतो. भादलवाडीचा तलाव व उजनीच्या विस्तीर्ण पाणलोटक्षेत्र परिसरातील खाद्यान्नावर या पिल्लांची जोपासना केली जाते. या सारंगगाराला भेट देवून काही वेळ बसून राहिल्यास या पक्ष्यांचे जगणे अनुभवता येते.
शिकारी प्राण्यांचा पक्ष्यांना धोका
सध्या उन्हाची तीव्रता वाढली आहे. नाजूक पिल्लांना बसण्यासाठी घरट्यात मऊ गवताचा गालीचा तयार करणे, चोचीतून पाणी व खाद्यान्न आणून पिल्लांना भरविणे, उन्हापासून संरक्षण व्हावे यासाठी पंखाची सावली देणे आदी कामे नर व मादी दोघे मिळून करत आहेत. वसाहत असलेल्या ठिकाणचे तलावाताली पाणी आटले आहे. यामुळे काटेरी झाडे उघडी पडली आहेत. यामुळे येथे शिकारी प्राण्यांचा या पक्ष्यांना धोका निर्माण झाला आहे. वास्तविक खडकवासला कालव्यातून या तलावात पाणी सोडणे गरजेचे आहे.
अशी आहे सध्याची स्थिती
१. अनेक झाडे वादळात पडल्याने जळून गेली आहेत.
२. अनेकदा येथील झाडे तोडून नेण्यात आल्याचेही बोलले जात आहे.
३. पक्ष्यांना घरटी बांधता यावी यासाठी सिमेंटच्या खांबांचे मचाण उभारले होते.
४. मात्र पक्ष्यांनी मचाणावर घरटे बांधण्याचे टाळल्याने हा प्रयोग अयशस्वी झाला होता.
या उपायांची गरज
१. नव्याने काटेरी बाभळीच्या झाडांची लागवड करणे गरजेचे आहे.
२. जनावरे चारण्यास मनाई करणे,
३. पक्ष्यांच्या सुरक्षिततेसाठी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी गस्त घालणे गरजेचे आहे.
४. तलावातील अवैध पाणी उपसा रोखण्याची गरज
५. वसाहतीखाली विणीचा हंगाम संपेपर्यंत पाणी साचून राहील यासाठी खडकवासला कालव्यातून पाणी सोडण्याबरोबर अन्य उपाययोजनांची गरज आहे.
६. तलावात होणाऱ्या अतिक्रमणांवर अंकुश ठेवणे महत्त्वाचे आहे.
भादलवाडीच्या ब्रिटिशकालीन तलावातील चित्रबलाक पक्षांचे सारंगगार विणीच्या हंगामासाठी प्रसिद्ध असलेले देशातील सर्वात मोठे सारंगगार आहे. मात्र याकडे वन विभाग, जलसंपदा विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. जैवविविधता संवर्धनावर जागतिक पातळीवर काम सुरू आहे. येथे मात्र या उलट परिस्थिती असल्याचे प्रकर्षाने आढळून येत आहे. पक्षांच्या सुरक्षिततेसाठी येथे तातडीने उपाययोजना करण्याबरोबर नैसर्गिक वारसा जपण्यासाठी सामाजिक सहभागातून येथे प्रयत्न होणे गरजेचे आहे.
- दत्तात्रेय लांघी, पक्षी निरिक्षक
02928, 02929
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.