काटेवाडी, ता. १२ : कृषी विभागाच्या योजनांसाठी महाडीबीटी पोर्टलवर फार्मर आयडीद्वारे अर्ज सादर करताना ७/१२, ८अ आणि आधार कार्ड अपलोड करण्याची गरज नाही. यामुळे अर्ज परत जाण्याचे प्रमाण कमी होईल आणि शेतकऱ्यांना योजनांचा लाभ लवकर मिळेल, असे कृषी आयुक्तालयाने स्पष्ट केले आहे.
शासनाच्या कृषी विभागाने महाडीबीटी पोर्टलवरील शेतकऱ्यांच्या अर्ज पडताळणीबाबत नवा निर्णय जाहीर केला आहे. २०२५-२६ पासून शेतकऱ्यांना कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी बंधनकारक आहे. या आयडीद्वारे शेतकऱ्यांचे नाव, जिल्हा, तालुका, गाव, सर्व्हे नंबर, गट नंबर आणि एकूण क्षेत्र यासारखी माहिती उपलब्ध होते. त्यामुळे अर्ज पडताळताना ७/१२, ८अ आणि आधार कार्ड यांसारखी कागदपत्रे अपलोड करण्याची आवश्यकता नाही. यापूर्वी काही शेतकऱ्यांचे अर्ज या कागदपत्रांअभावी परत (Send Back) केले जात होते. आता यापुढे ही कागदपत्रे नसल्यामुळे अर्ज परत करू नयेत, असे निर्देश सर्व विभागीय कृषी सहसंचालक आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
साहाय्यक आणि तालुका कृषी अधिकाऱ्यांनी यानुसार अर्ज पडताळणी करावी आणि शेतकऱ्यांना योजनांचा लाभ लवकर मिळवून देण्यासाठी त्वरित कार्यवाही करावी असे कृषी संचालक आर. एस. नाईकवाडी यांनी कळविले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.