माळशिरस, ता. ३१ : नायगाव (ता. पुरंदर) येथे ग्रामीण कृषी मौसम सेवा प्रकल्पांतर्गत शेतकरी जागरूकता कार्यक्रम उत्साहात पार पडला. पुणे कृषी महाविद्यालय आणि भारत हवामान विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या मेळाव्यात हवामान अंदाज व पीक नियोजनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सहयोगी अधिष्ठाता डॉ. दशरथ ठवाळ होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून सिद्धेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रवीण चोपडा उपस्थित होते. डॉ. व्ही. एम. लोंढे यांनी प्रकल्पाची माहिती दिली. संशोधन सहयोगी सुहास जाधव यांनी मेघदूत व दामिनी ॲप्सचे महत्त्व पटवून दिले. हवामान विभागाचे महेंद्र चौधरी यांनी पाच दिवसांचा हवामान अंदाज, पाऊस, तापमान आणि वाऱ्याचा वेग यानुसार शेतीचे नियोजन कसे करावे, याचे सविस्तर तंत्र सांगितले.
मृदशास्त्रज्ञ डॉ. बी. एस. कदम यांनी जमिनीचे आरोग्य व संतुलित खत वापराबाबत माहिती दिली. प्रवीण चोपडा यांनी सेंद्रिय शेतीचे अनुभव मांडले, तर डॉ. ठवाळ यांनी हवामान बदल आणि ऊस व्यवस्थापनावर मार्गदर्शन केले. याप्रसंगी ‘कृषी दर्शनी-२०२६’ व कृषी निविष्ठांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमासाठी राहुल कड, दादासाहेब लोखंडे यांनी परिश्रम घेतले. सुहास जाधव यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.