नसरापूर, ता. ३ : दिवळे (ता. भोर) येथील सरपंच विद्या गोविंद पांगारे यांनी त्यांचे जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द झाले असून, भूतलक्षी प्रभावाने ११ जुलै २०२४ पासून त्यांना सदस्य पदावर राहण्यास अपात्र ठरवण्यात आल्याचा निकाल जिल्हाधिकाऱ्यांनी दिला.
दिवळे येथील ग्रामस्थ सोपान बबन बाठे यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना आॅगस्ट २०२४ मध्ये अर्ज केला होता. त्यामध्ये दिवळे ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत सन २०२१ मध्ये विद्या पांगारे यांनी प्रभाग क्रमांक दोनमधून नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री या आरक्षणामधून निवडणुकीसाठी कुणबी प्रमाणपत्राच्या आधारे अर्ज दाखल केला होता. त्या बिनविरोध निवडून आल्या होत्या. परंतु निवडून आल्यावर एक वर्षात त्यांनी जात पडताळणी प्रमाणपत्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर करणे अपेक्षीत होते, ते त्यांनी सादर केले नाही. याबाबत चौकशी करून त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी बाठे यांनी केली होती.
या अर्जावर जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व संबंधितांना नोटीस बजावून सुनावणी निश्चित करून म्हणणे मांडण्यासाठी पुरेशी संधी दिली. त्यानंतर ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चे कलम १६(२) अन्वये जिल्हाधिकाऱ्यांनी २३ सप्टेंबर रोजी निकालाचा आदेश देत तक्रारदार सोपान बाठे यांचा अर्ज मान्य करत सदस्या, सरपंच विद्या गोविंद पांगारे यांना ग्रामपंचायत सदस्यपदी राहण्यास भुतलक्षी प्रभावाने जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत संपल्यापासून म्हणजेच ११ जुलै २०२४ पासून अपात्र ठरविण्यात येत असल्याचा निकाल दिला.
विद्या पांगारे या विद्यमान सरपंच आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या या निकालाने त्यांचे सदस्यत्वाबरोबर सरपंचपदही धोक्यात आले आहे. याबाबत त्यांनी सांगितले की, जिल्हाधिकाऱ्यांच्या निकालावर मी अपील करणार असून, त्याबाबत वकिलांशी चर्चा करत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.