नीरा नरसिंहपूर, ता. २६ ः ओझरे (ता. इंदापूर) येथील कारगिल शहीद वजीर रास्ते यांच्या २६ व्या पुण्यस्मरणानिमित्त माजी सैनिक, वारकरी सांप्रदाय व नागरिकांच्या उपस्थितीत रक्तदान, वृक्षारोपण, किर्तन आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले. शहीद वजीर रास्ते यांच्या स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून मान्यवरांच्या उपस्थितीत मानवंदना देण्यात आली. यावेळी अकलूज कारखान्याच्या संचालिका स्वरूपराणी मोहिते पाटील, वीरपिता दत्तात्रय रास्ते, वीरमाता बायडाबाई रास्ते, भरत रूपनवर, वर्धमान बोडके, दिलीप रास्ते आदी उपस्थित होते.
कारगिल शहीद वजीर रास्ते यांच्या स्मारकाला मानवंदना देताना वीरपिता व वीरमाता यांना अश्रू अनावर आले. वीरपिता दत्तात्रेय रास्ते बोलताना म्हणाले की, ‘‘देशाचे संरक्षण करताना कारगिल येथे माझ्या मुलाने बलिदान दिले. ऐन तारुण्यात वयाच्या २१ व्या वर्षी देशासाठी दिलेले हे बलिदान देश व
आम्ही कुटुंबीय कधीच विसरू शकणार नाही. आज २६ वर्षे उलटून गेली. परंतु, आम्हाला शासनाच्या वतीने देण्यात येणारी जमीन अद्यापही मिळालेली नाही. शासनाच्या दफ्तरदिरंगाईचा फटका झेलावा लागत असल्याची खंत आहे.’’
कार्यक्रमाचे औचित्य साधत ओझरे गावात व स्मारक परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच सोलापूर येथील सिध्देश्वर ब्लड बॅंकेच्या वतीने रक्तदान शिबिरही घेण्यात आले. त्यामध्ये ५० रक्तदात्यांनी रक्तदानाचा हक्क बजावला. त्यांना ट्रॅव्हल बॅग किंवा सोलापूर चादर भेट देण्यात आली. यावेळी पुणे, सोलापूर व सांगली जिल्ह्यातील माजी सैनिक, पदाधिकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर व ग्रामस्थांनी उपस्थित राहत आदरांजली वाहिली.