पुणे, ता. ३ : ग्रामीण विकासाला नवी दिशा देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाला पुणे जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, या अभियानाचा व्यापक प्रचार करण्यासाठी अभिनेते भाऊ कदम सोमवारी (ता. ५) विशेष जनजागृती कार्यक्रमांतून ग्रामस्थांशी संवाद साधणार आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी दिली.
जिल्ह्यातील १३८७ ग्रामपंचायतींपैकी तब्बल २८२ ग्रामपंचायतींनी शासनाच्या निकषानुसार अभियानात सक्रिय सहभाग नोंदविला आहे. कर वसुली, ई-गव्हर्नन्स, डिजिटल ग्रामपंचायत, डिजिटल शाळा-अंगणवाड्या, स्वच्छता, पाणीपुरवठा, अभिलेख अद्ययावत करणे आणि विविध विकासकामांमध्ये या ग्रामपंचायतींनी उल्लेखनीय प्रगती साधली आहे. या अभियानामुळे ग्रामपंचायतींमध्ये स्पर्धात्मक वातावरण निर्माण झाले असून ‘उत्कृष्ट ग्रामपंचायत’ ही संकल्पना प्रत्यक्षात येत आहे. जिल्ह्यातील या २८२ ग्रामपंचायतींच्या कामामुळे पुणे जिल्ह्याच्या एकूण कामगिरीत लक्षणीय भर पडल्याचेही पाटील यांनी सांगितले. याच पार्श्वभूमीवर, उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या दौंड तालुक्यातील गलांडवाडी, बारामती तालुक्यातील काटेवाडी आणि पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी या गावांत विशेष जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे ग्रामस्थांचा सहभाग आणखी वाढेल, ग्रामपंचायतींची कार्यक्षमता उंचावेल आणि पारदर्शक, विकासाभिमुख प्रशासनाची दिशा अधिक बळकट होईल, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.