टाकळी हाजी, ता. २५ : निमगाव दुडे (ता. शिरूर) गायरान हद्दीतील घोडनदी किनाऱ्यावरील विजेचे तीन रोहित्र मंगळवारी (ता.२४) मध्यरात्री चोरीस गेली. जानेवारी महिन्यापासून घोडनदीकाठ परिसरात तब्बल वीस रोहित्रे चोरीस गेल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.
रोहित्रांअभावी कृषिपंप बंद पडले आहेत. नदीत पाणी उपलब्ध असतानाही पाणी उपसा करता येत नसल्याने पिके जळू लागली आहेत.
घोडनदी काठावरील हा परिसर मलठण उपकेंद्राअंतर्गत येतो. चोरीस गेलेले ट्रान्सफॉर्मर २२ केव्ही क्षमतेचे असून त्यामध्ये कॉपरचा वापर असल्याची माहिती आहे. या उपकेंद्रातून आमदाबाद, निमगाव दुडे, रावडेवाडी, कवठे येमाई आदी परिसराला वीजपुरवठा केला जातो. मात्र गेल्या महिनाभरात मोठ्या प्रमाणात रोहित्र चोरी झाल्याने शेती सिंचन पूर्णतः विस्कळीत झाले आहे.
वारंवार होणाऱ्या रोहित्र चोरीमुळे शेतकऱ्यांमध्ये पोलिसांबाबतचा असंतोष वाढत असून प्रशासनाने तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
चोरींबाबत संदर्भात जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र गावडे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, मलठण उपकेंद्रात नवीन रोहित्र बसवून सर्व रोहित्रे २२ केव्ही ऐवजी ११ केव्हीमध्ये रुपांतरित करावीत. तसेच तांब्याऐवजी ॲल्युमिनियमचा वापर केल्यास चोरीचे प्रकार कमी होतील. शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी तातडीने रोहित्रे द्यावीत, अशी मागणी त्यांनी शिरूरचे उपअभियंता शरद माने व केडगावचे कार्यकारी अभियंता विकास आल्हाट यांच्याकडे केली आहे.
निमगाव दुडे गायरान जमिनीवर शेतकऱ्यांच्या पंपासाठी बसविलेले तीन रोहित्र एकाच वेळी चोरीस गेले आहे. याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या रोहित्राद्वारे दुडेवाडी व रावडेवाडी परिसरातील शेतकऱ्यांना घोड नदीतून पाणीपुरवठा केला जात होता.
- एस. मुरकुटे, शाखा अभियंता, विद्युत वितरण कंपनी
00892