थेऊर,ता.१४ : "सिंहगड किल्ल्याचा विकास रायगड आणि शिवनेरीच्या धर्तीवर करण्यासाठी तसेच छत्रपती राजाराम महाराज पुण्यतिथी कार्यक्रमाच्या निधीत वाढ करण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा केला जाईल," अशी ग्वाही हवेली पंचायत समितीचे सभापती युवराज काकडे यांनी दिली.
किल्ले सिंहगड येथे छत्रपती राजाराम महाराज यांच्या ३२६ व्या पुण्यतिथीनिमित्त हवेली पंचायत समितीच्या वतीने शासकीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी काकडे यांच्या हस्ते महाराजांच्या समाधीला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्या रूपाली कोंडे, पंचायत समिती सदस्या शुभांगी खिरीड, सदस्य युवराज वांजळे,गटविकास अधिकारी शेखर शेलार, इतिहास संशोधक नंदकुमार मते, माजी पंचायत समिती सदस्य दत्तात्रेय घोरपडे,वन अधिकारी बळीराम वायकर,मोडी लिपी अभ्यासक अशोक पाटील, प्रा.देशमुख, नगरसेवक सचिन दोडके, अमित गायकवाड, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी तसेच ढमढेरे परिवारासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. काकडे म्हणाले, "मुघलांविरुद्धच्या संघर्षात स्वराज्य टिकवण्यासाठी राजाराम महाराजांनी दिलेले योगदान अतुलनीय आहे. त्यांचे निधन ३ मार्च १७०० रोजी सिंहगड किल्ल्यावर झाले. दरवर्षी येथे पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित केला जातो. त्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी आणि किल्ल्याच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार माऊली कटके यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद व राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला जाईल.