वेल्हे, ता. २९ : राजगड तालुक्यातील डोंगरदऱ्यांमध्ये वसलेल्या अनेक गावांना अद्याप गावठाण नकाशे उपलब्ध नाहीत, तसेच शेतकऱ्यांची घरे पिढ्यानपिढ्या शेतातील वाड्या-वस्त्यांवर असल्याने अशा घरांना ''मिळकत पत्रिका'' मिळत नसल्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. गावठाण हद्दीबाहेरील घरांनाही सिटी सर्व्हे योजनेत सामावून घेऊन त्यांना मालकी हक्काची मिळकत पत्रिका द्यावी, अशी मागणी राजगड विकास परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे.
यासंदर्भात परिषदेचे उपाध्यक्ष उल्हास दारवटकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने नायब तहसीलदार मयूर बनसोडे यांना शुक्रवारी (ता.२७) निवेदन दिले. सध्या केवळ गावठाण हद्दीतील घरांचे सर्वेक्षण करून त्यांना मिळकत पत्रिका देण्याचे काम सुरू आहे. मात्र, वाडी, वस्ती, तांडे आदी ठिकाणी किमान १५ घरे असण्याची अट घालण्यात आल्याने कमी घरसंख्या असलेल्या वस्त्या आणि शेतात असलेल्या घरांना या योजनेतून वगळले जात आहे.
राजगड तालुक्यात अनेक शेतकऱ्यांची घरे शेतजमिनीत असून त्यांची ग्रामपंचायतीकडे ''८ अ'' नोंद आहे. तरीही या घरांना सिटी सर्व्हेचा लाभ मिळत नसल्याने भविष्यात मालमत्तेची शासकीय मोजणी करणेही कठीण होईल, असे परिषदेकडून सांगण्यात आले. परिषदेने मांडलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये गावठाणाबाहेरील सर्व घरांचे सिटी सर्व्हे करणे, सर्व शेतकऱ्यांना योजनेत सामावून घेऊन त्यांना मिळकत पत्रिका देणे तसेच १५ घरांच्या अटीमुळे होणारे नुकसान टाळणे यांचा समावेश आहे. या मागणीवर सकारात्मक निर्णय न घेतल्यास ग्रामीण भागातील हजारो शेतकरी या महत्त्वाच्या योजनेपासून वंचित राहतील, असे मत यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.