पुणे, ता. १९ : ‘‘कार्यकर्त्यापासून देशाच्या कॅबिनेट मंत्रिपदापर्यंतचा प्रवास प्रकाश जावडेकर यांनी केला. हा प्रवास डॉ. प्राची जावडेकर यांनी दिलेल्या खंबीर साथीमुळेच शक्य झाला. प्राची जावडेकर यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करताना राजकीय कार्यकर्त्याची पत्नी म्हणून कसे काम करावे, याचा वस्तुपाठ घालून दिला आहे. जावडेकर दांपत्याचे सहजीवन आदर्श आहे,’’ असे गौरवोद्गार मान्यवरांनी काढले.
निमित्त होते, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व लेखिका डॉ. प्राची जावडेकर लिखित आणि उन्मेष प्रकाशनातर्फे प्रकाशित ‘पुणे-दिल्ली-पुणे’ या पुस्तकाच्या प्रकाशनाचे. याप्रसंगी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, डॉ. प्राची जावडेकर, प्रकाशक मेधा राजहंस आदी उपस्थित होते.
डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, ‘‘केवळ राजकारणच नव्हे; तर प्रत्येक क्षेत्रात पती-पत्नी दोघांनाही वेळ द्यावा लागतो. दोघांनीही एकमेकांच्या कामांना समान प्रतिष्ठा देणे महत्त्वाचे आहे. कोणतीही महिला प्रेमापोटी निरपेक्ष भावनेने घर सांभाळून नोकरी, व्यवसायही करते. हेच सहजीवनाचे खरे वैशिष्ट्य आहे. राजकीय नेत्यांच्या जीवनात पत्नीची भूमिका, सहकार्य मोलाचे आहेच. परंतु, नारी शक्ती कायद्यामुळे २०२९ नंतर ५० टक्के महिला राजकारणात येतील. त्यामुळेच पतीराजांना त्यांना समजून घेण्याची वेळ येणार आहे, हे विसरू नका.’’
मोहोळ म्हणाले, ‘‘पक्षाच्या प्रतिकूल काळात काम करणाऱ्या कार्यकर्त्यापासून देशाच्या कॅबिनेट मंत्रिपदापर्यंतचा प्रकाश जावडेकर यांचा प्रवास आम्ही पाहिला आहे. प्राची जावडेकर या आजही उल्लेख करताना प्रत्येक वेळी ‘माझा पक्ष’ म्हणतात. एका कार्यकर्त्याची पत्नी ‘माझा पक्ष’ असे म्हणते, तेव्हा त्यात त्या दांपत्याचे आणि पक्षाचे यश असते.’’
पाटील म्हणाले, ‘‘राजकारणात पूर्णवेळ काम करणे कठीण आहे. स्वत:चा खासगी वेळ सार्वजनिक कामासाठी देणे ही अवघड बाब आहे. परंतु, प्राची जावडेकर यांच्या खंबीर पाठिंब्याच्या जोरावर प्रकाश जावडेकर यांनी पूर्णवेळ पक्षासाठी, देशासाठी काम केले.’’
‘‘माझ्यासारख्या मध्यमवर्गीय, साध्या मुलीचा पूर्णवेळ राजकारणी व्यक्तीची सहचारिणी म्हणून झालेला प्रवास मी या पुस्तकातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. प्रकाश जावडेकर यांनी पक्षाला वाहून घेतल्यानंतर मी पुण्यात राहून मुलांकडे, कुटुंबाकडे लक्ष दिले. पुढे दिल्लीतील वास्तव्यात ‘कमलसखी’ सारखे उपक्रम राबवताना आलेले अनुभव, अनुभूती या पुस्तकातून मांडल्या आहेत.’’ असे प्राची जावडेकर यांनी सांगितले. राजहंस यांनी प्रास्ताविक केले. स्नेहल दामले यांनी सूत्रसंचालन केले.
फोटोः 61326.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.