पुणे, ता. ४ : ‘‘लोकशाहीच्या चारही स्तंभांना जोडण्याचे काम अध्यात्म करते,’’ असे प्रतिपादन ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे प्रणेते श्री श्री रविशंकर यांनी आज येथे केले.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे ‘सकाळ’चे संपादक-संचालक श्रीराम पवार, दैनिक पुढारीचे मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव, ‘न्यूज १८ लोकमत’चे संपादक आशुतोष पाटील यांच्यासह आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा सन्मान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. सेनापती बापट रस्त्यावर हॉटेल मेरिएटमध्ये शनिवारी (ता. ४) हा सोहळा पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री चंद्रकांत पाटील होते.
‘‘शासन, प्रशासन, न्यायव्यवस्था आणि पत्रकारिता या लोकशाहीच्या चारही स्तंभांना अध्यात्माने जोडून ठेवले आहे. कारण जेथे अध्यात्म असेल तेथे चांगले राजकारण होते,’’ असे सांगून श्री श्री रविशंकर म्हणाले, ‘‘मानसिक बळ कमी होऊन माणसांतील अंतर दूर होण्याच्या काळातून आपण जात आहेत. या काळात स्थानिक भाषेच्या माध्यमांनी नागरिकांत उत्साह निर्माण केला पाहिजे. कामाच्या तणावातून दूर होण्यासाठी अध्यात्म हवे. कारण नैतिक मूल्य जिवंत ठेवण्याचे काम अध्यात्म करते.’’
सोलापूर जिल्हा परिषदचे मुख्याधिकारी दिलीप स्वामी, अभिनेते स्वप्नील जोशी, अभिनेत्री मधुराणी गोखले-प्रभुलकर, अनिल कुमार, शेखर मुंदडा, प्रकाश शहा, अनुप मेहता, बाबासाहेब औटी, मिलिंद कुलकर्णी, बबन दहिफळे, नीलेश खेडेकर, किरण दाभाडे आणि चैतन्य व नीलम धोका यांच्यासह जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज संस्थान, देहू आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट या संस्थांच्या प्रतिनिधींचाही या वेळी सन्मान करण्यात आला. पत्रकार संघाचे राज्य संघटक संजय भोकरे आणि प्रदेशाध्यक्ष किरण जोशी या वेळी उपस्थित होते.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.