पुणे - शहराच्या वेगवेगळ्या भागात पाहणी केल्यानंतर ‘पुणे शहर भारनियमन मुक्त’ असल्याचे कागदावरच दिसून आले आहे. शहराच्या कोणत्या ना कोणत्या भागात दररोज किमान एक ते दोन तास वीज पुरवठा खंडित होत असल्याचे चित्र पाहावयास मिळाले. विशेषतः उपनगरामध्ये हे प्रमाण सर्वाधिक असून कधी तांत्रिक अडचणीमुळे तर कधी अन्य कारणांमुळे. परंतु वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार नित्याचे झाले असल्याचे नागरिकांशी संवाद साधल्यानंतर समजले.
वास्तविक वीजबिलाच्या वसुलीमध्ये राज्यातमध्ये अग्रेसर असलेल्या शहरांमध्ये पुणे शहराचा समावेश होतो. त्यामुळे महावितरणबरोबरच स्पर्धा करून पुणे शहरात वीज पुरवठा करण्यासाठी खासगी कंपन्यांनी वीज नियामक आयोगाकडे अर्ज केले आहेत. त्यांचे हे द्योतक आहे. प्रत्यक्षात मात्र शहरात वेगळीच परिस्थिती असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे ‘पुणे भारनियमन मुक्त’ शहर असल्याचा जो दावा केला जात आहे, तो कागदावर आहे का, अशी शंका व्यक्त केली जात आहे.
...म्हणून केले सर्व्हेक्षण
पेठा असो की उपनगर...वीज पुरवठा खंडित झाल्याच्या तक्रारी दररोज ‘सकाळ’कडे येतात. तक्रारींची संख्या कमी असली, तरी त्यामध्ये सातत्य कायम असल्यामुळे ‘सकाळ’ने टिम नेमून शहरातील सर्व भागात भेट देऊन सर्व्हेक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार भेटी देऊन प्रत्यक्ष नागरिकांशी संवाद साधत वीज पुरवठ्याबाबतच्या समस्या जाणून घेतल्यानंतर ही सर्व माहिती समोर आली.
नागरिकांचे म्हणणे...
१) पावसाळा सुरू होऊन जेमतेम आठ दिवस झाले. परंतु वीज जाण्याचे प्रकार त्यापूर्वीपासून होत असल्याच्या तक्रारी बहुतांश भागातील नागरिकांकडून मांडण्यात आल्या. तर पावसाळ्यातही हे प्रमाण कायम असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
२) वास्तविक दरवर्षी महावितरणकडून पावसाळापूर्व देखभाल-दुरुस्तीची कामे केली जातात. तरी हे प्रकार का घडतात, प्रत्यक्षात ही कामे होतात की नाही, असे अनेक प्रश्न नागरिकांशी संवाद साधल्यानंतर उपस्थित झाले.
३) पुणे विभागात पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीणमधील गावांचा समावेश होतो. पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित झाला, तर प्रतिसाद वेळ (रिस्पॉन्स टाइम) कमी करण्यासाठी चार हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्त करण्यात आली असल्याचे महाविरणकडून सांगण्यात आले. तरी देखील ही परिस्थिती का, असा प्रश्न पुणेकरांकडून उपस्थित केला जात आहे.
अशी लढवतात शक्कल!
मध्यंतरी महापालिकेच्या हद्दीत ३४ गावे समाविष्ट कण्यात आली. त्यामुळे शहराची हद्द आणि लोकसंख्येतही वाढ झाली. त्यामुळे विजेच्या मागणीतही वाढ झाली आहे. परंतु त्या तुलनेत पुरेशा पायाभूत सुविधा निर्माण करण्यात महापारेषण आणि महावितरणला यश आले नाही.
त्यामुळे ही परिस्थिती असल्याचे महावितरणच्या कर्मचाऱ्यांशी बोलल्यानंतर नाव न देण्याच्या अटीवर त्यांनी ही माहिती दिली. त्यामुळेच कोणत्याही कारणांमुळे एखाद्या भागाचा वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर पर्यायी व्यवस्था केली जाते. परंतु ही पर्यायी व्यवस्था म्हणजे दुसऱ्या चक्राकार पद्धतीने अघोषित भारनियम करून वीजपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला जातो, असेही काहीही कर्मचाऱ्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.