पुणे, ता. ५ ः गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत मुख्य विसर्जन मार्गावरील बेलबाग चौकातून मानाचे गणपती दुपारी १२. ३० पूर्वी तर लोकमान्य टिळक चौकातून सायंकाळी ४ पर्यंत रवाना होतील, अशी ग्वाही मानाच्या गणपती मंडळांनी शुक्रवारी दिली. सर्व गणेश मंडळांच्या सहकार्यातून मुख्य विसर्जन मिरवणूक गेल्यावर्षीच्या तुलनेत किमान ३ तास लवकर पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
श्री कसबा गणपती मंडळ, तांबडी जोगेश्वरी मंडळ, गुरुजी तालीम मंडळ, तुळशीबाग मंडळ आणि केसरीवाडा गणपती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यांच्यातर्फे कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे म्हणाले, ‘‘विसर्जन मिरवणुकीबाबत केंद्रीय विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, पोलिस प्रशासन यांनी सार्वजनिक गणेश मंडळांशी संवाद साधला. त्यातून समन्वयाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच विसर्जन मिरवणुकीबाबत पोलिसांनी चांगल्या पद्धतीने नियोजन केले आहे. मानाच्या गणपती मंडळांसमोर किती पथके असतील, या पेक्षा मिरवणूक वेळेत पूर्ण होईल, यावर त्यांचा भर आहे. त्यानुसार मानाच्या गणपती मंडळांनी नियोजन केले आहे. पोलिसांच्या वेळापत्रकाचे आम्ही पालन करू. त्यांनी दिलेल्या कालमर्यादेत मिरवणूक पूर्ण होईल.’’
मानाच्या गणपती मंडळांपुढे प्रत्येकी तीन पथके असतील. त्यातील वादक संख्येवरही नियंत्रण असेल. मिरवणूक प्रवाही असेल, यावर आमचाही भर आहे. त्यानुसार आम्ही काटेकोर नियोजन केले आहे. या उत्सवासाठी लाखो भाविक येतात. त्यांना विसर्जन मिरवणुकीचा आनंद घेता येईल. उत्सवातून सलोखा निर्माण होतो, त्यासाठी आमचाही भर असेल, असे शेटे यांनी स्पष्ट केले.
-----------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.