पुणे, ता. ५ : ‘‘बालसाहित्याच्या माध्यमातून मनावर संस्कार कोरले जात असतात. बालसाहित्याचे लेखन करताना कल्पकतेबरोबर वास्तवाचे भान बाळगणे आवश्यक आहे. कारण बालसाहित्य हा गांभीर्य आणि जबाबदारीने लिहिण्याचा साहित्य प्रकार आहे,’’ असे मत संभाजीनगर येथील ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड यांनी व्यक्त केले.
अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्थेतर्फे बालसाहित्य क्षेत्रात योगदान दिल्याबद्दल भांड यांना यंदाचा जीवनगौरव पुरस्कार, तर वसई येथील ज्येष्ठ लेखिका आणि कवयित्री सिसिलिया कार्व्हालो यांना ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ कविवर्य ग. ह. पाटील पुरस्कार प्रदान करण्यात आले. पुरस्काराचे वितरण महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते झाले.
या वेळी शिक्षणतज्ज्ञ आणि साहित्यिक डॉ. न. म. जोशी, संस्थेचे अध्यक्ष राजन लाखे, कार्यवाह डॉ. दिलीप गरूड, विश्वस्त डॉ. मंदा खांडगे, सल्लागार डॉ. संगीत बर्वे आणि मुख्याध्यापिका शुभांगी कांबळे उपस्थित होते.
प्रा. जोशी म्हणाले, ‘‘स्पर्धेच्या युगात वाचन आणि खेळ हे मुलांच्या आयुष्यातून हरवून गेले आहेत, त्यामुळे बालसाहित्यिकांनी सध्याच्या मुलांच्या पातळीवर येऊन लेखन करणे आवश्यक आहे.’’
डॉ. जोशी म्हणाले की, वाचनाने मिळणाऱ्या समृद्धतेचे महत्त्व नवीन पिढीला समजून सांगणे आवश्यक आहे. सध्याच्या काळातील मुलांना आवडेल आणि भावेल असे साहित्य निर्माण करताना त्यामधून संस्कारमूल्य हद्दपार होणार नाहीत, याची काळजी घेतली गेली पाहिजे.
विजय जगताप आणि कविता मेहेंदळे यांनी मानपत्राचे वाचन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भरत सुरसे यांनी केले. विनय वाघ यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.