पुणे, ता. २१ ः पावसामुळे राज्यात विजेच्या धक्क्याने मृत्यू झालेल्या व्यक्तींची संख्या मोठी आहे. महावितरणच्या परिपत्रकानुसार (क्र. ५३३) अशा घटनांमध्ये मृत पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना चार लाख रुपये नुकसानभरपाई विनाविलंब मिळावी, अशी मागणी सजग नागरिक मंचाने महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
राज्यात सध्या विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याच्या घटना खूप घडत आहेत. अनेकदा महावितरण कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे निरपराध व्यक्तींचा त्यामध्ये मृत्यू होतो. अशा व्यक्तींच्या कुटुंबीयांची कधीही भरून न येणारी हानी होत असते. अशावेळी त्या मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना तातडीने नुकसानभरपाई मिळणे आवश्यक आहे. महावितरणच्या संचालक मंडळाने २०१६ मध्ये अशा प्रकरणात नुकसानभरपाई ४ लाख रुपये असावी, असा ठराव संमत केला आहे. तसे प्रशासकीय परिपत्रक ९ मार्च २०१६ रोजी प्रसारित करण्यात आले आहे. मात्र, दुर्दैवाने नागरिकांबरोबरच अनेक अधिकाऱ्यांनाही या परिपत्रकाची माहिती नाही. त्यामुळे मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई मिळावी, यासाठी पळापळी करावी लागते. अधिकाऱ्यांचे पाय धरावे लागतात अथवा मिळेल ती थातूरमातूर नुकसानभरपाई घेऊन गप्प बसावे लागते. त्यामुळे हे परिपत्रक राज्यामधील महावितरणच्या सर्वच कार्यालयांमध्ये ठळकपणे दिसेल अशा पद्धतीने प्रसिद्ध करावे. विजेच्या धक्क्याने मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना या परिपत्रकाप्रमाणे विनाविलंब नुकसान भरपाई देण्याचे आदेश अधिकाऱ्यांना द्यावेत, अशी मागणी संचालकांना दिलेल्या पत्रात मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केली आहे.
-----------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.