पुणे, ता. २७ ः ‘‘भटक्या-विमुक्तांना आजही समाजाने परिघाबाहेरच ठेवले आहे. आम्ही आजही बहिष्कृत आहोत. प्रस्थापितांनी नेहमीच आम्हाला बाजूला ठेवले. आमच्यासाठी वेगळे मंत्रालय केले; पण त्याला एक रुपयाचाही निधी नाही. पुरोगामी महाराष्ट्राची ही शोकांतिका आहे. आता तरी आम्हाला परिघात घ्या’’, अशी अपेक्षा ज्येष्ठ लेखक ‘उचल्या’कार लक्ष्मण गायकवाड यांनी मंगळवारी व्यक्त केली.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या (मसाप) १२०व्या वर्धापन दिनानिमित्त मसाप जीवनगौरव, कार्यकर्ता, शाखा व कार्यकर्ता पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गायकवाड यांना ‘मसाप जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या सन्मानाला उत्तर देताना ते बोलत होते. याप्रसंगी ‘मसाप’चे अध्यक्ष, ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे, विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष डॉ. शिवाजीराव कदम, उपाध्यक्ष विद्याधर अनास्कर, राजीव बर्वे, कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह सुनीताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी उपस्थित होते.
यावेळी ‘डॉ. भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कारा’ने ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. गीताली वि. मं. यांना सन्मानित करण्यात आले. ‘उत्कृष्ट मसाप शाखा फिरता करंडक’ हा ‘मसाप’ शाखा चोपडा (जि. जळगाव), ‘डॉ. बाबूराव लाखे वैशिष्ट्यपूर्ण शाखा पुरस्कार’ हा ‘मसाप’ शाखा पलूस (जि. सांगली), ‘मसाप कार्यकर्ता पुरस्कार’ जयंत येलुलकर आणि श्रीकृष्ण पुरंदरे यांना; तर म. श्री. दीक्षित स्मरणार्थ ‘मसाप स्नेहबंध पुरस्कार’ हा लेखिका डॉ. मंदा खांडगे यांना प्रदान करण्यात आला. सुरेश देशपांडे संपादित साहित्य पत्रिकेच्या वर्धापन दिन विशेषांकाचे प्रकाशन यावेळी झाले. गायकवाड म्हणाले, ‘‘जाती-पातीचे राजकारण कमी होणे अपेक्षित असताना उलट ते दिवसेंदिवस वाढतेच आहे. प्रत्येक जातीच्या संघटना वाढायला लागल्या आहेत. मात्र, साहित्य परिषदेने जातपात न पाहता आम्हाला पुरस्कार दिला, ही नव्या युगाची नांदी आहे. साहित्य म्हणजे केवळ करमणूक नसून, सर्वांच्या हिताची जोपासना करते, तेच खरे साहित्य.’’
‘‘समाजात स्थैर्य आल्याशिवाय संस्कृती निर्माण होत नाही. कारण स्थिरता ही संस्कृतीची पूर्वअट आहे’’, असे डॉ. कसबे यांनी सांगितले. प्रा. जोशी यांनी ‘मसाप’च्या कार्याचा आढावा घेतला. सूत्रसंचालन अंजली कुलकर्णी यांनी केले. विनोद कुलकर्णी यांनी आभार मानले.
‘समाजाची प्रमाणमूल्ये आजही पुरुषप्रधान’
‘‘स्त्री चळवळ ही सर्वांत गुंतागुंतीची चळवळ आहे, कारण या चळवळीतील प्रश्न हे घराघरांत सोडवायचे आहेत. आजही समाजाची प्रमाणमूल्ये पुरुषप्रधान आहेत. गर्भश्रीमंत घरातील स्त्री असो किंवा भटक्या-विमुक्त समाजातील स्त्री, सगळीकडेच अवस्था सारखी आहे. हे चित्र बदलण्यासाठी पुरुषांनी अधिक समंजस होण्याची गरज आहे’’, असे मत गीताली वि. मं. यांनी व्यक्त केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.