पुणे, ता. १७ ः जलयुक्त शिवार योजनेच्या तिसऱ्या भागात आता जिल्ह्यातील सर्व जलसाठवण बांधकामांची पडताळणी करून, त्यांना जिओटॅगिंग करण्यात येणार आहे. जिल्ह्यात वेगवेगळ्या विभागांकडे एकूण १ लाख २० हजार बांधकामे असून आतापर्यंत त्यातील १० हजारांहून अधिक बांधकामांचे जिओटॅगिंग पूर्ण झाले आहे. येत्या वर्षअखेर सर्व बांधकामांना जिओटॅगिंग पूर्ण करण्यात येणार आहे.
राज्यात जलयुक्त शिवार योजनेचा तिसरा टप्पा लवकरच सुरू होणार आहे. त्यापूर्वी सर्व जल साठवणूक स्रोतांचे अक्षांश आणि रेखांशानुसार फोटो काढून, त्याची एकत्रित माहिती गोळा केली जात आहे. ही सर्व माहिती राज्याच्या डॅशबोर्डावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच ती सामान्यांनाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी महाराष्ट्र सुदूर संवेदन केंद्राकडून प्राप्त झालेल्या फोटोंच्या आधारे प्रत्येक गावातील अशा रचनांचे जिओटॅगिंग करण्यात येत आहेत. त्यासाठी कृषी, वन, जिल्हा परिषद, जलसंधारण आणि जलसंपदा विभागाने हे काम आपापल्या पातळीवर पूर्ण करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिल्या आहेत.
जिल्ह्यातील १३ तालुक्यांमधील एक हजार ८१४ गावांमध्ये १ लाख २० हजार २१३ जल साठवण रचना आहेत. यातील १० हजार ३२९ रचनांचे जिओटॅगिंग पूर्ण करण्यात आले आहे. जिल्ह्यातील बांधकामांची संख्या मोठी असल्याने तसेच हे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी कर्मचाऱ्यांची आवश्यकता भासणार आहे. याबाबत सर्व संबंधित विभागांनीच ही काम करावे, असे आदेश डुडी यांनी दिले आहेत. सध्या कृषी विभागाकडे अशा जलसाठवण रचना सर्वाधिक असल्याने त्यांच्याकडील कर्मचाऱ्यांनीच ही पडताळणी करून माहिती गोळा करावी, असेही ते म्हणाले.
जिल्ह्यात शेततळ्यांपासून मोठ्या धरणापर्यंत जल साठवणूक केली जाते. अशा सर्व बांधकामांची एकत्रित माहिती या उपक्रमातून गोळा केली जाणार आहे. त्यामध्ये सध्या प्रत्यक्ष जागेवर किती बांधकामे आहेत, त्यातील पाण्याचा साठा किती आहे, त्याचे नेमके ठिकाण कोठे आहे, याची माहिती जमा केली जाणार आहे. यासाठी जलसंधारण विभागाने एका अॅपची निर्मिती केली आहे. ही माहिती गोळा करण्यासाठी जलसंधारण विभागाच्या कर्मचाऱ्यांसह कृषी वन विभागांसह जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांची मदत घेतली जाणार आहे.
-------