स्मार्ट मीटर न बसवण्याचा ठराव करा
स्वाभिमानी शेतकरी संघटना; १५ ऑगस्टच्या ग्रामसभेबाबत आवाहन
कोपर्डे हवेली, ता. ५ ः कऱ्हाड तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींनी येत्या १५ ऑगस्टला होणाऱ्या ग्रामसभांमध्ये गावात स्मार्ट मीटर न बसवण्याबाबत ठराव मंजूर करावा, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केले आहे.
संघटनेच्या निदर्शनास आल्यानुसार तालुक्यातील अनेक गावांत महावितरणकडून ग्राहकांच्या पूर्वसंमतीशिवाय स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरू आहे. त्या स्मार्ट मीटरमुळे अनेक ग्राहकांना जुन्या मीटरच्या तुलनेत अधिक वीजबिले येत असल्याच्या तक्रारी संघटनेकडे आल्या आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांत तीव्र नाराजीचे वातावरण आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ग्रामसभेत ठराव घेण्याचे आवाहन केल्याचे स्वाभिमानीचे तालुकाध्यक्ष प्रमोदसिंह जगदाळे यांनी स्पष्ट केले.
श्री. जगदाळे म्हणाले, ‘‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत स्मार्ट मीटर बसविणे सक्तीचे नसल्याचे स्पष्ट केले आहे, तरीही ग्राहकांची संमती न घेता स्मार्ट मीटर बसविण्याची कार्यवाही सुरू असल्याबद्दल स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तीव्र आक्षेप नोंदवत आहे.’’ त्यामुळे कऱ्हाड तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींनी १५ ऑगस्टच्या ग्रामसभेत गावामध्ये स्मार्ट मीटर बसविण्यास विरोध असून, ते बसवू नयेत, असा ठराव मंजूर करून त्याची प्रत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडे जमा करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे. तालुक्यातील सर्व गावांतून प्राप्त होणारे ठराव एकत्रित करून स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे कऱ्हाड विभागाच्या मुख्य अभियंत्यांना निवेदन देण्यात येईल. त्यानंतरही ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसविण्याचा प्रयत्न झाल्यास संघटना तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन उभारेल. तालुक्यातील सर्व ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक संघटनांनी या विषयाची गांभीर्याने दखल घेऊन ग्रामसभेत ठराव मंजूर करण्यासाठी सक्रिय सहभाग नोंदवावा.
.................
चौकट
...............
यांच्याकडे द्या ठराव
- वाठार ः देवानंद पाटील
- शिरगाव ः दादासाहेब यादव
- रेठरे बुद्रुक ः बापूसाहेब साळुंखे
- कोळे - रामचंद्र साळुंखे
- कऱ्हाड उत्तर ः प्रमोदसिंह जगदाळे