दावडी, ता. १९ : राजगुरुनगर-निमगाव मार्गाच्या दुरवस्थेबाबत ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल घेतली आहे. सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण औताडे यांच्या मुंडण आंदोलनानंतर प्रशासनाने मंगळवारी (ता. १८) या आठ किलोमीटर मार्गावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला तातडीने सुरुवात केली.
खरपुडी बुद्रुक (ता. खेड) परिसरातील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालक, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांचे हाल होत होते. वारंवार मागणी करूनही दुरुस्ती होत नसल्याने औताडे यांनी अनोख्या पद्धतीने मुंडण आंदोलन केले होते. सोमवारी (ता. १७) ‘सकाळ’मध्ये हे वृत्त प्रसिद्ध होताच यंत्रणा हलली.
मंगळवारी दिवसभर राजगुरुनगर ते निमगाव दरम्यानचे खड्डे बुजवण्यात आले. यामुळे प्रवाशांना तात्पुरता दिलासा मिळाला असला, तरी संपूर्ण मार्गाचे दर्जेदार डांबरीकरण करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. जनतेच्या प्रश्नाला वाचा फोडल्याबद्दल लक्ष्मण औताडे व ग्रामस्थांनी ‘सकाळ’चे आभार मानले आहेत.
००५१०,
००५१२