‘रब्बीत बियाणे विक्रीच करणार नाही’
--
विदर्भातील एका कृषी सेवा केंद्र संघटनेच्या अध्यक्षांचा निर्णय
--
विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा
नागपूर : बियाणे प्रकरणातील पोलिसांचा हस्तक्षेप, ‘साथी’ पोर्टलवरील नोंदींचा वाढता व्याप आणि निकृष्ट बियाण्यांच्या प्रकरणात कृषी विक्रेत्यांवर होणाऱ्या कारवाईमुळे वैतागलेल्या विदर्भातील एका कृषी सेवा केंद्र संघटनेच्या अध्यक्षांनी आगामी रब्बी हंगामात बियाणे विक्री न करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय वैयक्तिक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले असून, दुकानाच्या लेटरपॅडवर त्याबाबतचे पत्रही तयार केले आहे.
खरीप हंगामात निकृष्ट दर्जाच्या सोयाबीन बियाण्यांच्या तक्रारीनंतर बियाणे कंपन्यांसह काही कृषी विक्रेत्यांवरही कारवाई करण्यात आली. या प्रकरणांत पोलिस तक्रारी दाखल झाल्यानंतर तपासाच्या नावाखाली कृषी सेवा केंद्रधारकांना त्रास दिला जात असल्याचा आरोप संबंधित व्यावसायिकाने केला आहे. पोलिस कर्मचारी थेट दुकानात जाऊन दमदाटी करीत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. ्बियाणे कायद्यातील तरतुदींनुसार निकृष्ट बियाण्यांच्या प्रकरणात कारवाईची विशिष्ट प्रक्रिया असताना पोलिसांकडून होणारा हस्तक्षेप योग्य नसल्याची भूमिका त्यांनी मांडली. राजकीय हस्तक्षेपामुळे कारवाईचा व्याप वाढत असल्याने कृषी निविष्ठा विक्रेत्यांमध्ये अस्वस्थता असल्याचेही त्यांनी सांगितले. रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर अनेक बियाणे कंपन्यांचे प्रतिनिधी विक्रीसाठी संबंधित कृषी सेवा केंद्र संचालकाशी संपर्क साधत आहेत. मात्र, यंदा बियाणे विक्री न करण्याच्या निर्णयावर ते ठाम आहेत. त्यामुळे काही कंपन्यांच्या प्रतिनिधींना माघारी परतावे लागले. बियाणे कायद्यातील तरतुदींची माहिती वरिष्ठ कृषी अधिकाऱ्यांना आहे. मात्र त्यांच्याकडून देखील कोणतेच मार्गदर्शन अथवा अशा परिस्थितीत काय करावे याबाबत कोणतीच माहिती दिली जात नाही अशी खंत ही संबंधित कृषी सेवा केंद्र संचालकाने व्यक्त केली. राजकीय हस्तक्षेपापायी ते हतबल असल्याची स्थिती यंदाच्या खरिपात पहिल्यांदाच निर्माण झाल्याचा देखील त्यांचा आरोप आहे. यातच अकोला जिल्ह्यात पोलिसांकडून अशा प्रकरणाचे चौकशीसाठी थेट एसआयटी ची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये कोणतीही तांत्रिक माहिती नसताना पोलिसांचा वाढता हस्तक्षेप कृषी सेवा केंद्र धारकांसाठी चिंतेची बाब ठरला आहे.
-
ओलाव्याचीही चिंता
यंदा ‘एल निनो’च्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. खरीप हंगामातच अनेक भागांत पावसाअभावी बियाणे उगवणीत अडचणी आल्या. रब्बीतही जमिनीत पुरेसा ओलावा उपलब्ध न राहिल्यास उगवण आणि त्यानंतरच्या पिकाच्या वाढीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बियाणे विक्रीतून निर्माण होणाऱ्या संभाव्य तक्रारी आणि त्यानंतरच्या कारवाईपासून दूर राहण्यासाठी हा वैयक्तिक निर्णय घेतल्याचे संबंधित व्यावसायिकाने सांगितले.
-
चौकट
१९८०च्या दशकापासून व्यवसाय
संबंधित कृषी सेवा केंद्राचा बियाणे व कृषी निविष्ठा विक्रीचा व्यवसाय १९८० च्या दशकापासून सुरू आहे. मात्र, सध्याच्या परिस्थितीत व्यवसाय करण्यापेक्षा रब्बी हंगामात बियाणे विक्रीपासून दूर राहणे अधिक योग्य वाटत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.