MOD26A03359, MOD26A03360
अरण (ता. माढा) : श्री विठ्ठाचे आज संत शिरोमणी सावता महाराजांच्या कर्मभूमीत मोठ्या भक्तिभावात स्वागत करण्यात आले. (छायाचित्र : विरण कुलकर्णी, मोडनिंब)
भक्तीच्या मळ्यात श्री विठ्ठलाचे आगमन
अरण ग्रामस्थांतर्फे पांडुरंगाच्या पालखीचे उत्साहात स्वागत
सकाळ वृत्तसेवा
मोडनिंब, ता. १० : संत शिरोमणी सावता महाराज यांच्या भेटीसाठी निघालेल्या श्री विठ्ठलाच्या पालखीचे अरणनगरीत (ता. माढा) आगमन झाले. लाखो भक्तांच्या भेटीने शिणलेला पांडुरंग प्रक्षाळ पूजेनंतर सावतोबांच्या ओढीने अरणमध्ये पोचला. टाळ-मृदंगाच्या तालावर नाचत, फुगडी खेळत अरणच्या वेशीवर वारकरी भक्तिरसात न्हाऊन निघाले.
आषाढी वारीसाठी महाराष्ट्रातून लाखो वैष्णव पंढरपुरात हजेरी लावत असतात. मात्र, कर्मयोगी सावता महाराजांच्या समाधी सोहळ्यासाठी प्रत्यक्ष विठ्ठल धावून येत असल्याने सावता महाराजांनी पेरलेला भक्तीचा मळा भाविकांनी फुलून गेला आहे. अरण येथे श्री पांडुरंगाच्या पालखीचे स्वागत जिल्हा परिषद सदस्य वंदना कांबळे, माजी समाजकल्याण सभापती शिवाजीराजे कांबळे, जिल्हा परिषद सदस्य भारत शिंदे, सावतेबुवा ट्रस्टचे अध्यक्ष विठ्ठल गाजरे, सचिव ॲड. विजय शिंदे यांनी केले.
सायंकाळी ग्रामप्रदक्षिणेनंतर श्री पांडुरंगाची पालखी समाधी मंदिरात नेण्यात आली. येथे देवभेटीचा सोहळा पार पडल्यानंतर पालखी शिंदे वाड्यात विसावली. मंगळवारी (ता. ११) सावता महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त समाधी सोहळ्याचा प्रमुख कार्यक्रम होईल. यावेळी सावता महाराज मंदिरात श्री विठ्ठल पादुका आणल्या जातील व पुष्पवृष्टीचा कार्यक्रम होईल. त्यानंतर बाळासाहेब महाराज देहूकर यांचे समाधी सोहळा वर्णन करणारे कीर्तन होईल.
बुधवार (ता. १२) रोजी सायंकाळी सहा वाजता श्रीफळ दहीहंडी काल्याचा कार्यक्रम होईल. गुरुवार (ता. १३) देव विठ्ठल व संत सावता महाराज पालखीची एकत्रित ग्रामप्रदक्षिणा होऊन पादुका पुन्हा शिंदेवाड्यात आणल्या जातील. याच दिवशी कीर्तन व भारुडांचा कार्यक्रम होईल. शुक्रवार (ता. १४) पालखीचे प्रस्थान पंढरपूरकडे होऊन समाधी सोहळ्याची सांगता होईल.
MOD26A03362
अरण : येथील महामार्ग ओलांडताना प्रकाशा अभावी वारकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे.
महामार्ग क्रॉसिंगवर अंधार
पांडुरंगाच्या पालखीचे अरणमध्ये आगमन होत असतानाच सोलापूर-पुणे महामार्गावर प्रचंड गर्दी झाली होती. महामार्ग क्रॉसिंगच्या ठिकाणी पूर्णपणे अंधार असल्याने वारकऱ्यांना रस्ता ओलांडताना मोठी कसरत करावी लागली. वारकऱ्यांना रस्ता ओलांडून देताना पोलिसांनाही मोठी कसरत करावी लागली. सावता महाराज पुण्यतिथी सोहळा व दहीहंडी काला महोत्सवासाठी महाराष्ट्रभरातून वारकरी येत असतात. पुढील चार दिवसांत होणारी गर्दी पाहता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तातडीने दखल घेऊन येथील मुख्य चौकात हायमास्ट दिवे बसविणे गरजेचे आहे.