घोड शाखा कालव्याला
पाणी सोडण्याची मागणी
महाळुंगे पडवळ, जि. पुणे : आंबेगाव तालुक्यातील कळंब- गणेशवाडी येथून हुतात्मा बाबू गेनू सागराच्या (डिंभे धरण) डाव्या कालव्यातून कुकडी पाटबंधारे विभागाने घोड शाखा कालव्याला पाणी सोडावे, अशी मागणी दहा गावांतील नागरिकांनी केली आहे. घोड शाखा कालव्याच्या लाभ क्षेत्रातील कळंब, लौकी, थोरांदळे, भराडी, जाधववाडी, नागापूर व जुन्नर तालुक्यांतील मांजरवाडी आदी गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण होऊ लागली आहे. पाण्याअभावी पंचक्रोशीतील १३० हून अधिक विहीर व ५० हून अधिक बोअरवेलमधील पाणी पातळीत घट होऊ लागली आहे. वाढलेल्या तापमानामुळे जनावरांचा चारा सुकून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. लौकी गावातील सहाही बंधाऱ्यातील पाणीसाठा संपुष्टात येऊ लागला आहे. त्याचा परिणाम शेतीमालाबरोबरच पिण्याच्या पाण्यावर होऊ लागला आहे. गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीने तळ गाठला आहे.
कुकडी डावा कालव्यात
वरील पुलाची दुरवस्था
आळेफाटा, जि. पुणे : बोरी आणि आळे या दोन गावांना जोडणाऱ्या कुकडी डाव्या कालव्यावरील पुलाची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे संभाव्य अपघात टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने दुरुस्ती न केल्यास ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. या पुलाला बांधून सुमारे तीस वर्षे पूर्ण झाली आहेत. सध्या पुलाच्या खालच्या बाजूने स्लॅब कोसळण्यास सुरुवात झाली असून, आतील लोखंडी सळ्या उघड्या पडल्या आहेत. या मार्गावरून नेहमीच जड वाहनांची मोठी वर्दळ असते. तसेच कालव्याला पाणी सोडल्यानंतर पाण्याचा दाबही वाढलेला असतो. पुलाच्या कमकुवतपणामुळे येथे कधीही मोठी दुर्घटना घडू शकते. या बाबत स्थानिक ग्रामस्थांनी वारंवार सार्वजनिक बांधकाम विभागाला सूचना देऊनही प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. पुलाची भिंत आणि स्लॅबची तातडीने दुरुस्ती करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा पवित्रा परिसरातील नागरिकांनी घेतला आहे.
२६A०८११६
जुन्नरचा दहावीचा सरासरी
निकाल ९५.४१ टक्के
नारायणगाव, जि. पुणे : जुन्नर तालुक्यातील ८९ माध्यमिक शाळांचा सरासरी निकाल ९५.४१ टक्के लागला. परीक्षा दिलेल्या ५ हजार ५८ विद्यार्थ्यांपैकी ४ हजार ८२६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. २४ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला. २ हजार ६०५ मुलांपैकी २ हजार ४३९ मुले (९३.६२ टक्के), तर २ हजार ४५३ मुलींपैकी २ हजार ३८७ मुली (९७.३० टक्के) पास झाल्या. निकालात या वर्षीसुद्धा विद्यार्थिनींनी बाजी मारली. मागील वर्षी तालुक्याचा सरासरी निकाल ९६.८० टक्के लागला होता. गतवर्षाच्या तुलनेत या वर्षी निकालात १.३९ टक्के घट झाली. ५० शाळांचा सरासरी निकाल नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त लागला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.