पुणे - "ऑनलाइन शाळा सुरू झाल्यापासून सहावीत असणारा माझा मुलगा अथर्व नियमितपणे हजेरी लावत आहे. त्याला एकामागून एक धडे शिकविले जात आहेत. परंतु, त्याला अभ्यासक्रम नक्की किती कळला, हे काही समजायला मार्ग नाही. शाळेच्या नियमित सत्र परीक्षा कशी आणि कधी होणार?, असे शाळेला विचारले, तर आम्हाला अजून शासनाने काही सांगितलेले नाही, असे उत्तर मिळत आहे,' असे श्वेता पाटील सांगत होत्या. यंदा मुलांचे शैक्षणिक मूल्यमापन कसे होणार?, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी चिंताही व्यक्त केली.
कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून शिक्षण विभागाने प्रत्यक्ष शाळा बंद केल्या असल्या तरी जूनपासून ऑनलाइन शिक्षणाला सुरवात केली. व्हिडिओ कॉन्फरन्स संदर्भातील विविध ऍप, वॉट्सऍप, टॅबद्वारे ऑनलाइन शिक्षणाला प्रारंभ झाला. त्यानंतर सरकारने बारावीपर्यंतचा अभ्यासक्रम 25 टक्क्यांनी कमी केला. मात्र व्हर्च्युअल वर्गात विद्यार्थ्यांना शिकविलेले नेमके किती कळतेय, त्यांचे शैक्षणिक मूल्यमापन कसे करावे? तसेच दरवर्षी ऑगस्ट दरम्यान होणारी प्रथम घटक चाचणी कशी घ्यावी, या संदर्भात शाळांना कोणत्याही सूचना दिलेल्या नाहीत. त्यामुळे शाळा, शिक्षक आणि पालकांसमोर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक मूल्यमापन कसे करायचे, याचा पेच निर्माण झाला आहे.
जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
किती समजले, हे लक्षात येत नाही
ऑनलाइन शाळेत प्रत्येक धडा शिकवून झाल्यानंतर शिक्षक 10 ते 20 गुणांची छोटेखानी चाचणी वॉट्सऍपद्वारे घेतात. परंतु, व्हर्च्युअल वर्गात विद्यार्थ्यांना खरच किती समजत आहे, हे लक्षात येत नसल्याचे निरीक्षण येरवड्यातील गेनबा सोपानराव मोझे माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशालेचे मुख्याध्यापक संजय सोमवंशी यांनी नोंदविले. ते म्हणाले, यंदा अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला, तसा शैक्षणिक मूल्यमापन आणि नियमित प्रथम घटक चाचणी व सहामाही परीक्षेबाबतही मार्गदर्शक सूचना देणे आवश्यक आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक मूल्यमापन करणे शक्य होईल.
मूल्यमापनाबाबत हव्या सूचना
शाळांमध्ये घटक चाचणी परीक्षा कशा घ्याव्यात, याबाबत सरकारने मार्गदर्शन सूचना देणे आवश्यक होते. मात्र सहामाही परीक्षा जवळ आली, तरी कोणत्याही सूचना दिलेल्या नाहीत. तरीही प्रत्येक शिक्षक दर आठवड्याला 40 मिनिटांची परीक्षा वॉट्सअपद्वारे घेत आहेत. परंतु, ऑनलाइन शिक्षणात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक मूल्यमापन कसे करायचे, हा प्रश्न अनुत्तीर्ण असल्याचे चंदननगर येथील श्री संत तुकाराम माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सतीश धुमाळ यांनी सांगितले.
यंदा प्रत्येक इयत्तेनुसार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक मूल्यमापन कसे करावे, यावर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे (एससीईआरटी) काम सुरू आहे. गुजरातने यंदा मूल्यमापन कसे करावे, याची रूपरेषा ठरविली आहे. त्याचाही अभ्यास केला जात आहे. या सर्वांचा विचार करून एससीईआरटी सप्टेंबरमध्ये शैक्षणिक मूल्यमापनाबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर करेल. त्यानंतर टप्प्याटप्प्याने विद्यार्थ्यांचे मूल्यमापन होईल.
- विशाल सोळंकी, शिक्षण आयुक्त
किती समजले हे जाणून घेण्यासाठी...
- प्रत्येक धडा शिकवून झाल्यावर 10-20 गुणांची चाचणी घेणे
- वेळेच्या मर्यादेसह बहुपर्यायी प्रश्न ऑनलाइनद्वारे विचारणे
- आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी गुगल फॉर्मचा वापर करून ऑनलाइन प्रश्नपत्रिका पाठविणे (वेळेची मर्यादा देऊन)
- विद्यार्थ्यांची ऑनलाइन तोंडी परीक्षा घेणे
- 10, 20 किंवा (मोठ्या मुलांसाठी) 50 गुणांच्या प्रश्नपत्रिका त्या-त्या इयत्तेच्या विद्यार्थ्यांना वॉट्सऍपद्वारे पाठविणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.