अनेक वर्षांच्या खंडांनंतर, संसाराचा गाडा ढकलत असतानाच या महिलांनी पुन्हा एकदा हातात पेन घेतले आणि दहावी बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवले. ‘आता थांबायचं नाय...’ असेच जणू त्या म्हणत आहेत. जावळी तालुक्यातील ८१ महिलांच्या जिद्दीची ही यशोगाथा...
स्वप्नील शिंदे, सातारा
बचत गटाच्या चळवळीने देशातील महिलांच्या जीवनात क्रांती घडवून आणली आणि त्यांना एक नवे आयुष्य दिले. या चळवळीमुळे महिला केवळ एकत्र आल्या नाहीत, तर त्या खऱ्या अर्थाने स्वावलंबी आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या. सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील ग्रामीण महिलांनी इतिहास घडवला आहे. त्याची प्रेरणा राज्यातील इतर भागांतील महिलांनी नक्कीच घ्यावी अशी आहे. आयुष्यात मिळालेली ही दुसरी संधी त्यांच्या भविष्याला नवी कलाटणी देणारा ठरला आहे.
केंद्र सरकारने २०११ मध्ये ग्रामीण भागातील गरिबी दूर करण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण जीवन्नोनती मोहिमेची सुरुवात केली. ग्रामविकास विभागांतर्गत ‘महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान’ या स्वतंत्र संस्थेची स्थापना करण्यात आली. या मोहिमेला राज्यभर ‘उमेद’ नावाने ओळख मिळालेली आहे. उमेद मोहीम आणि ‘प्रथम’च्या पुढाकारातून जावळी तालुक्यातील महिलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. परिस्थितीमुळे अर्धवट राहिलेले शिक्षण पूर्ण करण्याची संधी मिळताच अनेक महिलांनी या उपक्रमात उत्साहाने सहभाग घेतला. वयाच्या चाळीशी-पन्नाशीत पुन्हा वर्गात बसणे, पुस्तके उघडणे आणि अभ्यास करणे त्यांच्यासाठी मोठे आव्हान होते. सुरुवातीला संकोच आणि भीती होती; पण त्यांच्यातील शिकण्याची जिद्द अधिक मजबूत होती.
दिवसभर घरकाम, शेती, मुलांचा सांभाळ आणि संसाराच्या जबाबदाऱ्या पार पाडल्यानंतर मिळेल त्या वेळेत त्यांनी अभ्यास केला. अनेक महिलांनी रात्री उशिरापर्यंत जागून अभ्यास करीत, तर काहींनी पहाटेचा वेळ शिक्षणासाठी राखून ठेवला होता. त्यांच्या मेहनतीचे आणि चिकाटीचे फळ नुकत्याच लागलेल्या दहावीच्या निकालातून दिसून आले.
जावळी तालुक्यातून ‘उमेद’च्या ८४ महिला दहावीच्या परीक्षेला बसल्या होत्या. त्यापैकी तब्बल ८१ महिलांनी यश मिळवले. विशेष म्हणजे अनेक महिलांनी प्रथम श्रेणी मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली. कोमल दगडू भिलारे, कार्तिकी वामन आढाव, सुषमा यशवंत लोखंडे आणि योगिता मोहन चव्हाण यांनी गुणवत्तेत अव्वल स्थान पटकावत ग्रामीण महिलांच्या सामर्थ्याची प्रचिती घडवली. या यशामागे सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची संकल्पना, प्रकल्प संचालक विश्वास सिद यांचे मार्गदर्शन; तसेच ‘उमेद’ आणि ‘प्रथम’च्या चमूचे सातत्यपूर्ण प्रयत्न महत्त्वाचे ठरले. तालुका व्यवस्थापक नीलेश भोसले, समन्वयक अपर्णा देवरे, अल्पेश खरात, संगीता देशमाने आदींनी महिलांना सातत्याने प्रोत्साहन देत शिक्षणाचा आत्मविश्वास दिला.
लग्नानंतर संसार, मुले आणि घरकामाच्या जबाबदाऱ्यांमध्ये माझे शिक्षण अर्धवट राहिले होते. ‘उमेद’ मोहिमेमुळे आम्हाला आयुष्यात दुसरी संधी मिळाली. घरची कामे सांभाळून रोज थोडा वेळ अभ्यासासाठी दिला. आज दहावी उत्तीर्ण झाल्याचा आनंद शब्दांत सांगता येणार नाही.
- कोमल भिलारे
फोटो- PNE26W17825
................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.