संपादकीय

जयपाल रेड्डी : तत्त्वनिष्ठ अन्‌ कणखर 

संजय जाधव

खंबीर अन्‌ कणखर नेता पक्ष नेतृत्वाच्या सूरात सूर मिसळून "सारे काही आलबेल आहे,' असे म्हणणाऱ्या नेत्यांचे उदंड पीक सध्या देशात आहे. यातच पक्ष नेतृत्वाच्या चुकांना विरोध करण्याऐवजी त्यांचे समर्थन करणारे कणाहीन नेतेही देशातील राजकीय पटलावर दिसत आहेत. याच वेळी एस.जयपाल रेड्डी यांच्या जाण्याने एक खंबीर आणि कणा असलेल्या राजकारण्याचे जाणे अधिक प्रकर्षाने जाणवते. 

पक्ष नेतृत्व काही चुकीचे करीत असेल तर त्याला आव्हान देणाऱ्या नेत्यांपैकी ते एक होते. इंदिरा गांधी यांनी देशावर आणीबाणी लादण्याचा निर्णय घेतला आणि रेड्डी पक्षातून बाहेर पडले. एवढ्यावरच न थांबता त्यांनी इंदिरा गांधी यांच्याविरोधातच मेडक मतदारसंघातून लढत दिली. यात ते पराभूत झाले तरी त्यांनी दाखविलेले मनोधैर्य आणि धाडस कालातीत होते.

पाच वेळा लोकसभा खासदार, दोन वेळा राज्यसभा सदस्य आणि चार वेळा आमदार असलेला हा नेता एक वेगळ्या मुशीतला होता. सध्या अतिशय दुर्मीळ होत चाललेल्या प्रामाणिक आणि तत्वनिष्ट राजकारण्यांच्या जातकुळीतील ते होते. रेड्डी यांनी माहिती व प्रसारण, नागरी विकास, पेट्रोलियम व नैसर्गिक वायू आणि विज्ञान तंत्रज्ञान खाती केंद्रात सांभाळली. कॉंग्रेस प्रणित "यूपीए-1' आणि "यूपीए-2'मध्ये ते केंद्रीय मंत्री होते. "यूपीए-2'च्या काळात मुकेश अंबानी यांच्या रिलायन्सला सात हजार कोटी रुपयांचा दंड त्यांनी ठोठावला. त्यामुळे त्यांना पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयावर पाणी सोडावे लागले. त्यांना काहीसे दुय्यम विज्ञान तंत्रज्ञान खाते सोपवून अडगळीत टाकण्यात आले.

विद्यार्थी दशेपासून रेड्डी हे राजकारणात सक्रिय होते. उस्मानिया विद्यापीठातील विद्यार्थी नेत्यापासून त्यांचा प्रवास सुरू झाला. कॉंग्रेसकडून सलग चार वेळा ते आमदार बनले. उत्तम वक्ते आणि अतिशय गांभीर्याने संसदीय कामकाजाकडे पाहणारे, अशी प्रतिमा रेड्डी यांच्या त्यावेळी आंध्र प्रदेश विधानसभेत होती. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशावर आणीबाणी लादल्यानंतर त्यांनी जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. त्यानंतर जनता पार्टीतून फुटून बाहेर पडलेल्या जनता दलात ते सहभागी झाले. ते जनता पार्टीचे 1985 ते 1988 या काळात सरचिटणीस होते. जनता पार्टीकडून ते महबूबनगरमधून लोकसभेवर निवडून गेले. राज्यसभेचे सदस्य आणि नंतर विरोधी पक्षनेते म्हणून त्यांची कारकीर्दही गाजली. रेड्डी यांनी 1999 मध्ये पुन्हा कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर ते मिरालगुडा आणि चेवेल्ला मतदारसंघातून ते लोकसभेवर जिंकून गेले. उत्कृष्ठ संसदपटूचा पुरस्कार मिळविणारे ते दक्षिणेतील पहिले आणि सर्वांत तरुण नेते होते. अशा या समाजाशी आणि विचारांशी बांधिलकी असणाऱ्या नेत्याचे जाणे देशातील राजकारणात पोकळी निर्माण करणारे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

Mughal Treasury Found: बापरे! मुगल काळातील खजिना सापडला, मनरेगा कामगारांना उत्खननादरम्यान असं काही सापडलं की प्रशासनही हादरलं

Success Story: १४ तास अभ्यास, परीक्षेच्या २० दिवस आधी घरातील सदस्य गमावला, अडचणीवर मात करून तरुण सीए बनला

SCROLL FOR NEXT