tuberculosis
tuberculosis sakal
संपादकीय

क्षयरोगापासून मुक्तीसाठी...

डॉ. सुहास पिंगळे

‘जागतिक क्षय रोग दिन’ २४ फेब्रुवारीला पाळला जातो. या निमित्तानं हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की क्षयरोगाची अनेक रुपे आहेत आणि म्हणूनच विविध लक्षणेही आहेत.

‘जागतिक क्षय रोग दिन’ २४ फेब्रुवारीला पाळला जातो. या निमित्तानं हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की क्षयरोगाची अनेक रुपे आहेत आणि म्हणूनच विविध लक्षणेही आहेत.

गेल्या महिन्यात एका मित्राचा फोन आला. तो म्हणाला, ‘डॉक, बायकोशी बोल’. बोलण्यातून असं निष्पन्न झालं की बाईंना महिनाभर ताप, भूक मंदावणे, वजन कमी होणे अशी लक्षणे आहेत. त्यांना दवाखान्यात बोलावलं. त्यांना बोलवत नव्हतं इतका अशक्तपणा होता. रुग्ण उच्चशिक्षित तसेच उच्च पदावर विराजमान! तपासण्यांची भली मोठ्ठी फाईल त्यांनी पुढे केली. मी ती बाजूला सारत म्हटले, आम्ही रुग्ण तपासतो व उपचार करतो. तपासणीनंतर मी एकच प्रश्न विचारला.

‘आपण घरी दूध कोणते घेता? डेअरीचे की गोठ्याचे?’ त्या म्हणाल्या, ‘गोठ्याचे ताजे दूध’; पण हा प्रश्न का बरं विचारलात, डॉक्टर?’

मग मी स्पष्ट केलं की, डेअरीचं ‘पॅकबंद’ दूध ‘पाश्चराईज्ड’ असते व म्हणूनच जंतूविरहित असते. उलट गोठ्याच्या दुधात अनेक प्रकारचे जंतू असू शकतात; याचे कारण अनेक गायी- म्हशींना क्षयाचा आजार असतो व तो या दुधावाटे आपल्याला होऊ शकतो. या रुग्णालाही आतड्याच्या क्षयरोगाचे निदान झाले!

खरं म्हणजे मेंदू, हृदय इ.सर्व ठिकाणी क्षयाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. देशात जवळपास तीस लाख रुग्ण क्षयग्रस्त असून सुमारे पाच लाख मृत्यु क्षयामुळे होतात. जगात देशातील क्षयबाधितांची संख्या २८ टक्के म्हणजेच सर्वोच्च असून मृत्यूचे प्रमाण ३८ टक्के आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं २०३०पर्यंत क्षयरोगाच्या पूर्ण उच्चाटनाचा संकल्प केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तर २०२५पर्यंतच हे लक्ष्य गाठण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी ‘राष्ट्रीय क्षयरोग निवारण प्रकल्प’ या नावानं महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे.

त्याअंतर्गत : १) प्रत्येक क्षयरुग्णाचं निदान करणे व प्रत्येक रुग्णापर्यंत पोचणे. यात खाजगी डॉक्टरांकडील रुग्णदेखील समाविष्ट आहेत.आधुनिक पद्धतींचा वापर करुन लवकरात लवकर निदान करणे. प्रत्येक क्षयरोग्याची नोंदणी अनिवार्य करणे. २) क्षय रोग कोणत्याही अवयवाला होऊ शकतो. त्याचे निदान करतांना सूक्ष्मदर्शकाच्या मदतीने हे निदान करावे लागते. उदा.: बेडक्याच्या तपासाने फुफ्फुसांच्या क्षयाचे निदान होते. प्लुरसीचे निदान पाण्याच्या तपासणीने व आतड्यांच्या क्षयाचे निदान ‘बायप्सी’ने होते. या सर्व तपासण्या सरकारी व्यवस्थेत मोफत होतात. त्याचबरोबर क्षयरुग्णांना सर्वोत्कृष्ट औषधे सरकार मोफत देत आहे. ३) प्रतिबंधात्मक उपाय : क्षयरुग्णाच्या कुटुंबियांची मोफत म्हणजे विनामूल्य तपासणी. ४) समाजातील विविध घटकांना वरील कार्यक्रमात सामावून घेणे. राजकीय सहभाग व त्याअंतर्गत निधीची अर्थसंकल्पी तरतूद करणे. सर्व क्षयरुग्णांना पोषणाकरिता रु ५००/= प्रतिमहिना मदत देणे. याशिवाय इतरही अनेक प्रकल्प आहेत.

‘क्षयमुक्त भारता’साठी सर्व नागरिकांचे प्रयत्न हवेत. ‘आहेरे’ वर्गातील नागरिक ‘नाहीरे’ वर्गातील अशा रुग्णांच्या पोषणाची जबाबदारी उचलू शकतात. विविध संस्था, मोठ्या आस्थापना हा भार उचलू शकतात. खाजगी कंपन्यादेखील हातभार लावू शकतात. अशा प्रत्येक रुग्णाची माहिती सरकारी यंत्रणांना ताबडतोब कळविणे आम्हा खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांचे कर्तव्यच आहे. क्षयाची लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरी सल्ला घेणे, ही क्षयरोग निमूर्लनाची पहिली पायरी. रोगनिदान झाल्यावर पूर्ण इलाज करणे ही दुसरी आणि अंतिम पायरी. सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये. डेअरीचेच दूध पिणे आदी बाबी अमलात आणणे जरुरीचे आहे. अनेक प्रख्यात नट नट्या, प्रसिद्ध व्यक्तींनाही क्षयाची लागण याच कारणाने झाली आहे. त्यामुळे अशा प्रतिबंधात्मक सवयी लावून घेणे, फार गरजेचं आहे.

आपण सर्व मिळून हा ‘गोवर्धन’ उचलूया आणि अमिताभ बच्चन यांच्या ‘टी.बी हारेगा, देश जितेगा!’ ह्या घोषणेची पूर्तता करूया!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT