Sant Tukaram Maharaj
Sant Tukaram Maharaj Sakal
editorial-articles

या जगण्यावर...जळो जिणे लाजिरवाणे

सकाळ डिजिटल टीम

- डॉ. दिलीप धोंडगे

‘जोडोनिया धन उत्तम वेव्हारे’ या चरणाने सुरू होणारा तुकोबांचा अभंग शासकीय गाथेत २८६४ व्या क्रमांकावर आहे. गृहस्थाश्रमी प्रापंचिक माणसासाठी तुकोबांनी आदर्श आचारसंहिता आखून दिलेली आहे. धन जोडायचंच. पण गरजेपुरतं धन जोडायला संतांनी कधीच विरोध केला नाही. ‘भिक्षापात्र अवलंबिणे। जळो जिणे लाजिरवाणे।।’ असे म्हणून लाचारीचा धिक्कार केला आहे. `जयाचे ऐहिक धड नाही तयाचे परत्र पुससी काई’ हा ज्ञानदेवांनी दिलेला निर्वाळा आहे. धन जोडायचे पण उत्तम व्यवहार करून! अशा व्यक्तीची उत्तम प्रगती होते. नेहमी परोपकारी जिणे जगावे, दुसऱ्याची निंदा करू नये. स्वार्थापेक्षा परमार्थातला आनंद अवीट असतो. (living this life destroy shameful life article Dilip Dhongade)

जमेल तसा व जमेल तेवढा परोपकार करायला हवा. प्राणीमात्रांवर दया करायला हवी. किती दया करावी? तर ‘जे जे भेटे भूत। ते ते मानिजे भगवंत।।’ इतकी दया करावी. प्रत्येक जीव चिन्मय आहे, या दृष्टीने जर प्रेम केले तर जग प्रेममय होईल. ‘खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे’, ही साने गुरुजींची प्रार्थना संतविचारांचे सार आहे. आपण स्वतः चिन्मय आहोत व दुसरा, मग तो कोणताही प्राणिमात्र असो तोही चिन्मय आहे, हा विचार सगळ्यांना एकत्र बांधणारा आहे. भूतमात्रांकडे पाहण्याच्या या विचारानेच गाई-म्हशींचे पालन करायचे ते आपल्या कुटुंबातील घटक आहेत असे समजून. खेड्यापाड्यात गाईम्हशी, गुरेढोरे, शेळ्यामेंढ्या यांना लक्ष्मी म्हटले जाते.

कृषिव्यवस्थेला पूरक असे हे प्राणिमात्र असल्यामुळे आणि कृषिवलाच्या धनवृद्धीत त्यांचा सहभाग असल्यामुळे लक्ष्मी हा गौरव सार्थ होय. पूर्वी दळणवळणाची साधने नव्हती. पायी प्रवास करावा लागायचा. परिणामतः परोपकारी वृत्तीचे लोक जागोजागी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करत. तुकोबा यामुळे तान्हेल्या जीवन वनामाजी असे म्हणतात.

पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांसाठी अन्नोदक म्हणजे अन्न व पाणी याचा धर्म अनेक परोपकारी मंडळी करताना दिसतात. जगत असताना अनेक व्यक्तींशी अनेक प्रकारे आपला संबंध येतो. संबंध सुरळीत असतात तोपर्यंत उभय व्यक्ती संतुष्ट असतात. पण संबंध बिघडले की वितुष्ट बळावते. पण उभयतांपैकी एक शांत राहिला आणि आपणांस कोणालाही दुखवायचे नाही या भावनेने वागला तर तो आपल्या कुळाचा उद्धार करणारा ठरतो. तुकोबांचे याबाबतचे म्हणणे असे की : शांतिरुपे नव्हे कोणाचा वाईट वाढवी महत्त्व वडिलांचे. आपणाकडून कुळाचा उद्धार झाला पाहिजे. अन्यथा कुळाला कलंक ठरून बट्टा लागतो. या अभंगाच्या शेवटच्या कडव्यात तुकोबा म्हणतातः ‘तुका म्हणे हेचि आश्रमाचे फळ। परमपद बळ वैराग्याचे।।’ हा आश्रम म्हणजे अर्थातच गृहस्थाश्रम होय.

गृहस्थाश्रम राहून वैराग्याचे परमपद कसे प्राप्त होणार? गृहस्थाश्रम आणि वैराग्य या तशा परस्परविरोधी गोष्टी आहेत. पण प्रपंचाचं रुपांतर परमार्थात केलं तर वैराग्याचं बळ लाभतं. हेच बळ मग मोक्ष प्राप्त करुन देतं. सामान्य प्रापंचिक माणसासाठी हा फारच मौल्यवान हितोपदेश आहे. आपलं नित्यनैमित्तिक काम निष्ठापूर्वक करणे आणि आपलं मानव्य जपणे या आधारावर जगणे परमसुंदर करता येते. काम कोणतेही असो, ते करतानाच त्याला परहिताचे परिमाण मिळवून दिले तर सुगंध प्राप्त होतो. रानावनात जाऊन तपाचरण करणे, जपजाप्यात काळ कंठणे वगैरे कर्मठ उपायांनी वैराग्याचे बळ प्राप्त होत नाही. आपले जगणे आपण सुंदर करायचे, ते परोपकारार्थ वेचायचे या लोकहितैषी अधिष्ठानाने आगळेवेगळे वैराग्य प्राप्त होते. संतमंडळ हे कळवळ्याच्या जातीचे असल्यामुळे आणि त्यांना सामान्य माणसांच्या उद्धाराची काळजी असल्यामुळे त्यांच्या उद्धाराचा मार्ग प्रशस्त होण्यासाठी तुकोबांनी ही परवडणारी आचारसंहिता कथन केली आहे. गृहस्थाश्रमाच्या चौकटीतसुद्धा किती भव्यपणे जगता येते याचे दिग्दर्शन या आचारसंहितेत आहे. ‘उद्धरेत् आत्मनम् आत्मनाः’ या भगवंताच्या वचनानुसार आपण आपला उद्धार करू शकतो. आपले जगणे संपूर्णतः स्वीकारून ते सौंदर्यपूर्ण करू शकतो. यासाठी तुकोबांनी ही आचारसंहिता दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Sharad Pawar : शरद पवार अन् उद्धव ठाकरेंना बघण्यासाठी इचलकरंजीत चेंगराचेंगरी

IPL 2024: चेन्नईकडून 36 वर्षीय गोलंदाजाचं पदार्पण! पहिल्याच सामन्यात झाला अनोखा विक्रम

Raigad News : महाविकास आघाडीची कितीही नाचत असतील भुते, तरी रायगड मध्ये हरणार आहेत अनंत गीते - रामदास आठवले

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: शिवम दुबे गोलंदाजीला आला अन् चेन्नईला विकेटही मिळवून दिली; बेअरस्टोचं अर्धशतक हुकलं

SCROLL FOR NEXT