Crime
Crime sakal
संपादकीय

दृष्टिकोन : आता कोठे गेला मानवाधिकार?

माधव भांडारी

प्रसिद्ध लेखक सलमान रश्दी यांच्यावर गेल्या शुक्रवारी प्राणघातक हल्ला झाला. त्या हल्ल्यात झालेल्या जीवघेण्या जखमांमधून ७५ वर्षांचे रश्दी सुखरूप बाहेर येत आहेत, असे सध्याच्या बातम्यांवरून दिसते आहे.

सलमान रश्दींवर झालेल्या हल्ल्यानंतर उमटलले जागतिक पडसाद नीट पाहिले तर एरवी अभिव्यक्ती स्वातंत्र्य, उदारमतवाद, व्यक्तिस्वातंत्र्य यावर बोलघेवडेपणा करणारी मंडळी गप्प असल्याचे दिसते. एरवी भारताला सहिष्णुतेचे धडे देणारी अमेरिकी प्रसारमाध्यमेही बऱ्याच अंशी शांत आहेत. हे सगळे कोणत्या मानसिकतेतून घडते?

प्रसिद्ध लेखक सलमान रश्दी यांच्यावर गेल्या शुक्रवारी प्राणघातक हल्ला झाला. त्या हल्ल्यात झालेल्या जीवघेण्या जखमांमधून ७५ वर्षांचे रश्दी सुखरूप बाहेर येत आहेत, असे सध्याच्या बातम्यांवरून दिसते आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्क शहराच्या पश्चिम भागात एका कार्यक्रमात ते सहभागी झाले असताना हा हल्ला झाला. भर सभागृहात, मंचावर बसलेल्या रश्दींवर एका तरुणाने अनेक वार करून त्यांना जखमी केले. त्यांना ठार मारण्याच्या हेतूनेच हा हल्ला केला गेला होता. रश्दी यांनी ३४ वर्षांपूर्वी, १९८८मध्ये लिहिलेल्या Satanic Verses ह्या पुस्तकाबद्दल त्यांना ठार मारण्याचा फतवा इराणी मुस्लिम धर्मगुरू अयातुल्ला खोमेनीने जारी केला होता. जो रश्दी यांना ठार मारेल, त्याला ३० लाख डॉलर इनाम देण्याचीही घोषणा तेव्हा केली गेली होती. त्या फतव्याला आणि अयातुल्ला खोमेनी मरण पावल्यालाही आता ३३ वर्षे होऊन गेली. त्यानंतर हा हल्ला झाला आहे. हल्ला करणारा तरूण त्यावेळी जन्मालाही आलेला नव्हता. आज तो केवळ २४-२५ वर्षांचा आहे. म्हणजे ज्यावेळी हा विवाद निर्माण झाला होता, त्यावेळचे काहीही त्याला स्वत:ला माहिती नाही. तरीही त्याने हे अमानवी कृत्य केले आहे. ही मानसिकता कशातून निर्माण होते? ती तयार करण्याची कोणती व्यवस्था, यंत्रणा आहे? ती चालवणारे कोण आहेत? तिची कार्यपद्धती काय आहे? हे सगळे महत्त्वाचे प्रश्न आहेत. पण त्यांची चर्चा इथे करण्याचा माझा इरादा नाही.

मला पडणारे प्रश्न वेगळे आहेत. सलमान रश्दी जन्माने भारतीय असले तरी गेली अनेक दशके ते ब्रिटन-अमेरिकेत स्थायिक झालेले आहेत. १९८८मध्ये त्यांच्या Satanic Verses ह्या पुस्तकावर बंदी घालणारा भारत हा पहिला देश होता. प्रचंड बहुमत असलेली काँग्रेस त्यावेळेला सत्तेवर होती व राजीव गांधी पंतप्रधान होते. जनता दलाचे तेव्हाचे सरचिटणीस सय्यद शहाबुद्दीन यांनी त्या पुस्तकावर बंदी घालण्यासाठी मोहीम सुरु केली होती. तिला प्रतिसाद देऊन राजीव गांधींनी त्या पुस्तकावर बंदी घालून टाकली. जेव्हा आपल्याकडे त्या पुस्तकावर बंदी घातली तेव्हा ते पुस्तक प्रकाशित झाले नव्हते, त्यामुळे बंदीची मागणी करणारे व बंदी घालणारे यांच्यापैकी कोणीही ते वाचले नव्हते. आजही त्या पुस्तकाबद्दल रश्दींवर आगपाखड करणाऱ्या कोणी ते पुस्तक वाचले असण्याची शक्यता नाही. मी स्वत: ते वाचलेले नाही. त्यांची अन्य काही पुस्तके मी वाचली आहेत. लेखक म्हणून ते काही फार महान आहेत, असे मला कधी वाटलेले नाही. तरीसुद्धा पुस्तकावर बंदी घातली गेली, हे काही मला योग्य वाटले नव्हते. पण आपले पहिले पंतप्रधान पं.नेहरूंपासून पुस्तकांवर बंदी घालण्याची एक भली मोठी परंपरा आपल्याकडे आहे.

सारे चिडीचूप

माझ्या दृष्टीने खरा मुद्दा वेगळा आहे. रश्दींवर हा हल्ला न्यूयॉर्कमध्ये झाला. गेली काही वर्षे अमेरिकी वृत्तपत्रे, विशेष करून ‘न्यूयॉर्क टाइम्स’ भारतातल्या असहिष्णू वातावरणाबद्दल भरभरून लिहित असतो. भारतात Hate Crime वाढत आहेत, त्यामुळे मानवाधिकारांचे हनन होते आहे, विचारस्वातंत्र्याची, उपासना स्वातंत्र्याची गळचेपी होते आहे, असाही दावा हे वृत्तपत्र तिथे बसून करते व त्याबद्दल भारत सरकार आणि एकूण हिंदू समाजावर कडाडून टीका करत असते. रश्दी हल्ल्यानंतर मी ‘न्यूयॉर्क टाइम्स’च्या बातम्या आणि संपादकीय काळजीपूर्वक वाचतो आहे. मला त्यांच्या लिखाणात कुठेही त्यांच्या सरकारवर किंवा हल्लेखोरावर टीका आढळली नाही. हल्लेखोराच्या धार्मिक मान्यतांचा उल्लेख सापडला नाही. मानवाधिकार, लेखनस्वातंत्र्य, विचारस्वातंत्र्य यापैकी कशाची गळचेपी झाल्याचे उल्लेख वाचायला मिळालेले नाहीत. एका ७५ वर्षांच्या वृद्ध व्यक्तीवर प्राणघातक हल्ला सार्वजनिकरीत्या केल्यामुळे त्या व्यक्तीच्या जगण्याच्या मूलभूत हक्कावरच हल्ला झाला आहे, असेही कुठे म्हटलेले आढळले नाही. उलट हल्लेखोर तरूण स्वत:ला निर्दोष कसा म्हणवतो, त्याची आई काय म्हणते अशा जातकुळीचा, ह्ल्लेखोराची भलामण करणारा मजकूरच ‘न्यूयॉर्क टाइम्स’मध्ये वाचायला मिळतो आहे. इतर अमेरिकी वृत्तपत्रेही या विषयावर त्या अर्थाने गप्पच आहेत.

भारतात घडलेल्या कोणत्याही लहानसहान घटनांबद्दल उठसूट ट्वीट ट्वीट करणारी सर्व बोलघेवडी अमेरिकी, युरोपीय सेलेब्रिटी जमात आत्ता एकदम चूप आहे. त्यामुळे त्यांच्या तोंडाकडे बघून ट्वीट ट्वीट करणारी आपल्याकडील जमातसुद्धा गप्प आहे. या विशिष्ट वर्गाने अशा प्रकारे गप्प रहाण्यामागचे, मौन बाळगण्यामागचे रहस्य काय आहे? रश्दींवर केल्या गेल्या हल्ल्याचा साधा निषेधसुद्धा भारतातील ‘स्वयंघोषित महान व नामवंत, विचारवंत, लेखक, उदारमतवादी’ जमातीने केलेला नाही. एरवी उठसूट कोणत्याही घटनांबद्दल झणझणीत, खडखडीत भाष्य करणारे महान पत्रकारन यावेळी मात्र मूग गिळून गप्प बसले आहेत. जळजळीत अग्रलेख लिहिणारे सगळे संपादक ह्या घटनेबद्दल मौन बाळगून आहेत. रश्दींचे विचार, आचार, उच्चारस्वातंत्र्य किंवा मूलभूत मानवी हक्क यांची बाजू घेऊन एकही भारतातील पुरोगामी, प्रागतिक लेखक, विचारवंत १९८८मध्ये उभा राहिला नाही आणि आजही उभा रहात नाही, असे का? हाच प्रश्न तस्लिमा नसरीन यांच्या बाजूनेही विचारावा लागतो. हा सर्व ‘विशेष वर्ग’ एम. एफ. हुसेन यांच्या बाजूने मात्र दंड थोपटून उभा असायचा. अर्थात हा वर्ग १९७५मध्ये आणीबाणी लादून सर्व नागरी स्वातंत्र्ये हिरावली गेली होती, तेव्हासुद्धा त्या हुकुमशाहीच्या विरोधात उभा राहिला नव्हताच. याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की ह्या विशेष वर्गाची मानवाधिकार, विचारस्वातंत्र्य, उदारमतवाद, Secularism वगैरे विषयीची भूमिका खोटी व ढोंगी तर आहेच; पण त्याही पलीकडे जाऊन ती निव्वळ फसवी आहे. त्या भाषेचा वापर करण्यामागे त्या वर्गाचे काही छुपे उद्देश आहेत.

कमालीचा बोलघेवडेपणा करणारा आपल्या देशातला हा वर्ग एक विशिष्ट विषयपत्रिका (अजेंडा) घेऊन योजनाबद्ध रीतीने काम करीत आहे. हा वर्ग केवळ भारतातच नसून, तो अमेरिका, युरोपमध्येसुद्धा आहे आणि ते सर्व एकच आहेत, एकत्र आहेत, त्यांचे उद्दिष्टदेखील सारखे आहे. पूर्वी या वर्गाचे उद्दिष्ट साम्यवाद आहे, असे सांगितले जात असे, तेही एक धादांत खोटे विधान होते. आता मात्र हा वर्ग सरळसरळ कट्टरपंथी धर्माच्या राजकारणाचा प्रसार करण्यासाठी काम करतो आहे. त्यांचे सगळे वैचारिक पवित्रे सामान्य माणसाची दिशाभूल करण्यासाठी घेतलेले पवित्रे आहेत. त्यांना फक्त एका धर्माच्या, त्यातही केवळ हिंसेवरच पूर्ण विश्वास ठेवणाऱ्या अनुयायांसाठी अनुकूल वातावरण तयार करायचे आहे. ते वातावरण तयार करण्यासाठी त्यांच्या अमानुष, पाशवी कृत्यांवर पांघरूण घालून त्यांचे समर्थन हा वर्ग सतत करत असतो. जेव्हा असे समर्थन करण्यासारखी स्थिती नसते, तेव्हा हा वर्ग आजच्यासारखे दगडी मौन बाळगून बसतो.

‘आता कोठे गेले मानवाधिकार, विचारस्वातंत्र्य, व्यक्तिस्वातंत्र्य, उदारमतवाद?’ या प्रश्नाचे उत्तर जर हा वर्ग आता देणार नसेल तर सलमान रश्दी प्रकरणामुळे ह्या वर्गाने ओढून घेतलेला बुरखा पूर्णपणे फाटला आहे, असे म्हणण्यात काहीही गैर नाही. हा वर्ग कोणत्याही अर्थाने आधुनिक विचारांचा पुरस्कर्ता नसून जगाला पाशवी गुलामगिरीच्या मध्ययुगाकडे नेऊ पहाणाऱ्या शक्तींचा हस्तक आहे, हे समाजाने समजून घेतले पाहिजे.

(लेखक महाराष्ट्र भाजपाचे उपाध्यक्ष आहेत.)

madhav.bhandari@yahoo.co.in

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT