rajnish joshi writes about fakruddin bennur
rajnish joshi writes about fakruddin bennur 
संपादकीय

एकतेचा पाईक 

रजनीश जोशी

सोलापूरसारख्या एका अर्थाने आडवळणी असलेल्या गावातून संपूर्ण भारतासह पाकिस्तान, नेपाळमध्ये जाऊन सामाजिक समता, हिंदू-मुस्लिम ऐक्‍याची जोपासना करण्यासाठी संघर्ष करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून प्रा. फक्रुद्दीन बेन्नूर यांची सर्वदूर ओळख होती. मुस्लिम समाजात सुधारणांची गरज असल्याचे त्यांनी वेळोवेळी सांगितले.

त्यांनी इतिहासाचे केवळ अध्यापनच केले नाही, तर आपल्या अभ्यासपूर्ण विवेचनाने समाज ढवळून टाकण्याचे काम केले. डॉ. असगर अली इंजिनियर यांच्यासमवेत एकतेची चळवळ पुढे नेण्याचे काम केले. त्यासाठी दौरे केले. अशा वेळी डॉ. इंजिनियर यांच्यावर झालेल्या हल्ल्याने डगमगून न जाता आपला विचार अधिक प्रभावीपणे समाजापुढे मांडण्याचे काम केले. कोणत्याही धर्मातील कट्टरतावादाला त्यांचा विरोध होता. त्यामुळे स्थानिक कट्टरतावाद्यांच्या रोषाला त्यांना सामोरे जावे लागले होते. ते एकतेचे पाईक होते. दलित चळवळीतही त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. मुस्लिम समाजाची स्थिती-गती ध्यानात घेऊन आरक्षणाच्या मागणीसाठी त्यांनी "महाराष्ट्रीय मुस्लिम अधिकार आंदोलन' सुरू केले. विषमतेचे निर्मूलन झाले पाहिजे, या विचाराने ते झपाटल्यासारखे काम करीत होते. चौफेर लेखन करीत होते.

महाराष्ट्रातील बहुतेक सर्व नियतकालिकांमधून त्यांनी लेख लिहिले. "राष्ट्रवाद, साम्राज्यवाद आणि इस्लाम,' "मुस्लिम राजकीय विचारवंत आणि राष्ट्रवाद' अशा पुस्तकांमधून त्यांनी भारतीय मानसिकतेचीच चिकित्सा केली. राष्ट्रवादाचे विश्‍लेषण करताना त्याचे व्यापकत्व त्यांनी अधोरेखित केले. धर्माधारित राष्ट्रवादाचे घातक परिणाम दाखवून दिले. साहित्य चळवळीतही ते अग्रेसर होते. त्यांचा "गुलमोहोर' हा काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेच. पण, सूफी संप्रदायाचे वाङ्‌मय त्यांनी अभ्यासले होते. अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य परिषदेची स्थापना त्यांनी केली आणि तिच्या वतीने मुस्लिम मराठी साहित्य संमेलनेही भरवली. भारताच्या गंगाजमनी संस्कृतीवर त्यांचे प्रेम होते.

संकुचित विचारसरणीच्या लोकांनी या देशातील सौहार्द संपविण्याचा प्रयत्न केला आहे. पण, माणसामाणसांतील प्रेम कुणाच्या चिथावणीने संपत नसते, यावर त्यांचा विश्‍वास होता. हे प्रेम, हे सौहार्द उजागर करण्यासाठी प्रा. बेन्नूर यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. व्यक्तिगत पातळीवर संयमी आणि मितभाषी वाटणारे प्रा. बेन्नूर मित्रांच्या संगतीत खुलत. त्यांच्या "कुदरत' या निवासस्थानी अशा मैफली होत. त्यात त्यांचे हिंदू-मुस्लिम मित्र जिव्हाळ्याने सहभागी होत. काही जातीसमूह आणि विविध धर्मांचे काही लोक राजकीय पाठिंब्याने समाजव्यवस्थेला छेद देण्याची मानसिकता जोपासत असताना प्रा. बेन्नूर यांच्यासारखा समाजहितैषी, एकतावादी आपल्यातून जाणे, ही मोठी हानी आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जीव दे म्हटलं म्हणून एखाद्याने खरंच जीवन संपवलं तर काय? हायकोर्टाची महत्त्वाची टिप्पणी

Instagram Algorithm : इन्स्टाग्रामच्या नियमांमध्ये मोठा बदल; ओरिजिनल कंटेंट होणार प्रमोट.. मात्र यूजर्सचं टेन्शन वाढणार!

Namrata Sambherao: "महाराष्ट्राची लाडकी नमा..."; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरनं नम्रता संभेरावला लिहिलं खास पत्र

Viral Video: खिशात खेळण्यातली पिस्तूल सापडल्यानंतर पकडले कान, मुंबई मेट्रो स्टेशन वरील चिमुकल्याचा व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : कल्याणमधून श्रीकांत शिंदे अर्ज भरणार, जोरदार शक्तीप्रदर्शनाची तयारी

SCROLL FOR NEXT