आपण वयानं वाढत जातो, जग पाहतो, तसं अनेक गोष्टी खटकू लागतात. त्यातली सर्वाधिक खटकणारी गोष्ट म्हणजे, या जगात "जे सक्षम असतील, तेच टिकतात,' हे उघड कुणी बोलत नाही, पण खूप जणांची श्रद्धा असते, या नियमावर. खरं म्हटलं तर हा जंगलचा नियम; तो माणसांना कसा लागू होईल? पण काही जण स्वतःपुरता या नियमाचा स्वतःच्या सोयीप्रमाणे अर्थ काढून मोकळे होतात. निसर्गनियमाप्रमाणे वय वाढत जातं, तसे आपण वाढत जातो. हे वाढत जाणं, मोठं होणं वेगळं, अन् एक माणूस म्हणून आपली वाढ होणं वेगळं. इतर कुणाचं स्वास्थ्य हिरावून न घेता, स्वतःमधील उपजत क्षमतांचा योग्य वापर करून एखाद्यानं मोठं होणं वेगळं. ते समाजजीवन गतिमान करण्यासाठी, एकूणच जगण्याचा दर्जा उंचावण्यासाठी वरदानच ठरतं. पण आज अशा प्रकारच्या नैसर्गिक वाढीवर विश्वास असणाऱ्यांनी अवतीभवती पाहिलं, की मनाला जळजळीत चटका बसावा, असं दृश्य अनेकदा दिसतं. त्यांच्या मनाची घालमेल इतरांना सहसा दिसत नाही, अन् ती त्यांना उघडपणं व्यक्तही करता येत नाही. कारण काही वेळा समोर जे मोठं म्हणून आलेलं असतं, ते अनैसर्गिक वाढीतून उगवलेलं असतं. कुणाचं तरी, काही तरी ओरबाडून हे वैभव उभारलेलं असतं अन् त्यालाच "पुरुषार्थ,' कर्तबगारी' अशी बिरुदे बळेबळेच चिकटविलेली असतात. अशांनी इमले- माड्या उभं केल्याचं वाईट वाटत नाही. वाईट याचं वाटतं, की अशा प्रवृत्तीमुळे सामान्य माणसाच्या जगण्यातील चांगुलपणावरील विश्वास उडून जातो. समाजात काही माणसं अशीही असतात, जी आयुष्यभर ताठ राहून जीवनाला कुरूप बनविणाऱ्या ज्या ज्या गोष्टी आहेत, त्यांच्याविरुद्ध झगडत राहतात. उदात्त मूल्ये उरी बाळगून विजिगीषू वृत्तीने जगत असतात. जे जे पिडलेले आहेत, नाडलेले आहेत, त्यांच्या वेदनांत त्यांचे आतडे गुंतलेले असते. प्रवाहपतीत होण्याइतकं लांच्छन दुसरं नाही, ही त्यांची धारणा असते. त्यांच्याकडं भरपूर परिपक्व अन् प्रौढ मन असतं, पण जगाचे तथाकथित शहाणपणाचे व्यवहार त्यांनी कधी पाळलेले नसतात. दर महिन्याची किराणा दुकानदाराची थकलेली उधारी म्हणजे त्यांच्या प्रामाणिक जगण्याचा पुरावा असतो. अनेकदा संधी असूनही गैरमार्गाने येणारा लोकांचा पैसा त्यांनी मृत्तिकेसमान मानलेला असतो. आयुष्यभर फकिरी पत्करून समाजसेवा करणाऱ्यांची अशी अनेक उदाहरणे आपल्याकडे आहेत आज जिकडंतिकडं माणसातल्या चांगल्या प्रवृत्तीचं दर्शन दुर्मिळ व्हावं अन् इमलेवाल्या मवाल्यांचाच बोलबाला सर्वत्र व्हावा, असं वातावरण पाहायला मिळतं. इतकंच नाही तर "त्यांच्यात क्षमता होती म्हणून त्यांनी कमावलं. केवळ आपणास संधी मिळाली नाही म्हणून, अन्यथा आपणही तेच केलं असतं,' असा विचार मनात डोकावत असेल, तर हा त्या काही थोर माणसांच्या, त्यांच्या जीवन जगण्याच्या पद्धतीचा जय म्हणायचा की पराजय? |