Life 
सप्तरंग

एकटेपणातून सुटकेसाठी राहू आनंदे

अच्युत गोडबोले

एकटेपणाच्या समस्येचं गांभीर्य लक्षात घेऊन डॉ. हेमंत देवस्थळी यांनी सुरू केलेल्या ‘आनंदयात्रा’ या ‘स्वमदत गटा’ला १२ जानेवारीला एक तप पूर्ण होईल. त्यानिमित्त ‘एकटेपणा’विषयी मांडलेले विचार.

एका सर्वेक्षणाप्रमाणे ४० टक्के लोकांना आयुष्यात कधी ना कधी तरी एकटं वाटलेलंच असतं आणि त्यातल्या २० टक्के लोकांना ते तीव्रतेनं जाणवतं. कित्येकांना सतत एकटं वाटतं, तर काहींना मधूनमधून. जगाची लोकसंख्या रोज २ लाख लोकांनी वाढत असली आणि आज इंटरनेट व सोशल मीडियामुळं आपण खूपच ‘कनेक्‍टेड’ असलो, तरीही जगातला एकटेपणाही वेगानं वाढतोय. आजूबाजूला अगदी आपल्या ओळखीची किंवा नात्यातली माणसं असली, तरीही एकटं वाटू शकतं, हे अजबच आहे! आपण गर्दीतही एकटे असतो, याचं कारण आपण गर्दीतल्या इतरांशी भावनिक नातं जोडू शकत नाही.

आजूबाजूला किती माणसं आहेत, ती अनोळखी आहेत की ओळखीची, नात्यातली आहेत की नाहीत, यावर एकटेपणा अवलंबून नसतो. पण, आपण त्यांच्याशी ‘रिलेट’ करू शकतो की नाही, यावर हे अवलंबून असतं. म्हणूनच, अमेरिकेतली ‘ऑक्‍युपाय वॉल स्ट्रीट’ची विषमतेविरुद्धची चळवळ असो किंवा आपल्याकडली अण्णा हजारेंची भ्रष्टाचाराविरुद्धची चळवळ असो; त्यांच्यात उत्स्फूर्तपणे सामील झालेले अनोळखी लोक जेव्हा एकत्र येतात तेव्हा आपण कुठल्यातरी कारणासाठी, ध्येयासाठी एकत्र आलो आहोत, या भावनेतूनच त्यांच्यातलं नातं तयार होतं आणि मग एकटं वाटत नाही. त्या सर्वेक्षणाप्रमाणे एकाकी असणाऱ्यांपैकी ६० टक्के लोक हे विवाहित असतात. पहिले काही रोमॅंटिक दिवस उलटल्यावर त्यांच्या नात्यात कोरडेपणा आलेला असतो. अशी कोरडी जोडपी मुलांकरिता एका छताखाली राहतात आणि काही जण मग बाहेर कुठंतरी प्रेम आणि ओलावा शोधत बसतात. इथंही प्रश्‍न येतो तो म्हणजे, ओलाव्याचा आणि संवादाचा. जर या गोष्टी असतील आणि एकमेकांविषयी आदर असेल, वागणुकीत समानता असेल; तर ते दोघं प्रत्यक्ष शरीरानं जवळ असोत वा नसोत, त्यांना एकटेपणा जाणवत नाही. पण, ते नसेल तर मात्र एकटेपणा वाटायला लागतो. अगदी त्यांच्यात शरीरसंबंध असले तरीही!

विविध दुष्परिणाम 
एकटेपणाचे प्रकृतीवरही वाईट परिणाम होतातच. एका संशोधनाप्रमाणे त्यांना जास्त थंडी वाजते, त्यांचा रक्तदाब वाढतो, ते अनेकदा चिंताग्रस्त असतात आणि त्यांच्यावर सतत काहीतरी ताणतणाव असतो. या सगळ्यामुळं त्यांना नैराश्‍य येतं. या सगळ्याचा परिणाम म्हणून तीव्र एकटेपणा ज्यांना जाणवतो, त्यांच्यामध्ये लवकर मृत्यू होण्याची शक्‍यता १४ टक्‍क्‍यांनी वाढते, असंही दिसून आलंय. काहींना मात्र एकटं राहूनही एकाकी न वाटण्याची कला साध्य असते. ते आपल्या कामात व्यग्र असतात.

अमेरिकेत सगळ्यात जास्त लोकांना एकटेपणा वाटतो, असं आढळून आलंय. सोशल मीडियाचं व्यसन लागलेल्या लोकांना चटकन एकटेपणा जाणवतो. इंटरनेट आणि सोशल मीडिया यांचे अनेक फायदे आहेत आणि त्यांचे चांगले परिणामही होतात. उदाहरणार्थ त्यांच्यामुळंच अनेक वर्षं भेटू न शकलेले, वेगवेगळ्या खंडांत राहणारे वर्गमित्र किंवा नातेवाईकही आता एकमेकांशी भेटू/बोलू शकतात आणि त्यामुळं जवळ येतात. नाती जुळून येतात. पण, सोशल मीडियाचे अनेक दुष्परिणामही समोर येताहेत. त्याचं व्यसन लागलं तर ती एक विकृतीच होते. फेसबुकवर शेकडो ‘मित्र’; पण प्रत्यक्षात ज्याच्याजवळ आपण आपलं मन मोकळं करू शकू असा एकही मित्र नाही, अशी आज परिस्थिती आहे. ती लक्षात घेऊनच पुण्यात डॉ. हेमंत देवस्थळी यांच्या पुढाकारानं ‘आनंदयात्रा’ ही संस्था उभी राहिली.

मने जुळण्यासाठी...
व्यावहारिक पातळीवर एकट्या लोकांनी एकत्र यावं, गप्पा माराव्यात, सहलीला जावं, गाणी ऐकावीत आणि त्यातून मैत्री जुळावी, एकटेपणा कमी व्हावा, या उद्देशानं डॉ. हेमंत देवस्थळी यांच्या पुढाकारानं ‘आनंदयात्रा’ ही एक संस्था उभी राहिली आणि ती लवकरच लोकप्रिय झाली. डॉ. देवस्थळी हे अर्थशास्त्रातले तज्ज्ञ. ते प्राचार्य होते.

देवस्थळी यांचे अनेक शोधनिबंध भारतात आणि परदेशात प्रकाशित झाले आहेत. ‘आनंदयात्रा’मध्ये अविवाहित, विधवा/विधुर/घटस्फोटित अशी सगळी ‘एकटी’ राहणारी मंडळी येतात. इथं काही लोकांची मनं जुळल्यामुळं त्यांनी एकत्र राहण्याचं किंवा लग्न करण्याचंही ठरवलंय. पण, ‘आनंदयात्रा’ ही काही विवाह संस्था नाहीये. खरं तर ‘आनंदयात्रा’सारख्या अनेक संस्थांची आज महाराष्ट्रालाच काय; पण देशाला गरज आहे. त्यामुळं डॉ. देवस्थळींचं करावं तेवढं कौतुक थोडंच आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आणि शिवसेनेपासून राज ठाकरे दूर का होत गेले? वाद ते मनोमिलन timeline

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलच्या ३००+ धावा! मोडला विराट कोहलीचा ११ वर्षांपूर्वीचा विक्रम, रिषभ पंतचीही फिफ्टी

Sushil Kedia: माज उतरला, पण गुर्मी कायम; माफीनंतरही नवं ट्विट करत सुशील केडिया पुन्हा बरळले, शहांची स्तुती तर ठाकरेंना...

Divyang Students Demand : दिव्यांग विद्यार्थ्यांची होतेय कुचंबना! ३० जुलैपर्यंत वसतिगृहाचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा...; विद्यार्थ्यांचा सरकारला इशारा

Raigad News: अलिबाग मार्गावरील कोंडी सुटणार, प्रवाशांचा आरामदायी प्रवास होणार; सरकारचा प्लॅन सत्यात उतरणार

SCROLL FOR NEXT