book walking on the age
book walking on the age sakal
सप्तरंग

सह्याद्रीचा गोष्टीवेल्हाळ दस्तऐवज

प्रतिनिधी

पॉल सेलोपेक नावाचा अवलिया पृथ्वीवर चालतो आहे. ‘नॅशनल जिओग्राफिक’ वाहिनीचा ‘आऊट ऑफ एडन वॉक’ प्रकल्प म्हणजे पॉल सेलोपेकचा इथिओपियापासूनचा प्रवास. मानवाच्या पाऊलखुणा शोधत पॉलनं आफ्रिकेतून चालायला सुरुवात केली. युरोप ओलांडून तो भारतीय उपखंडात आला आणि म्यानमारमार्गे सध्या चीनमध्ये पोहोचला आहे.

रशिया, ऑस्ट्रेलिया ओलांडून तो अमेरिकामार्गे दक्षिण अमेरिकेत पोहोचेल, तेव्हा मानवाच्या दोन लाख वर्षांच्या स्थलांतराचा इतिहास त्यानं लिहिलेला असेल. पॉल आठवायचं कारण, 'वॉकिंग ऑन द एज' हे प्रसाद निक्ते यांचं पुस्तक. पॉल मानवी पाऊलखुणा शोधत चालतोय, प्रसाद सह्याद्रीच्या कडांवरून चालले.

अशा कृतींमागं केवळ साहस हा एकच भाव नसतो. त्याहून खूप मोठा, मानवाचा, मानवतेचा धांडोळा घेण्याचा सुप्त भाव असतो. निसर्गाचा कार्यकारणभाव समजून घेण्याची ऊर्मी असते. अफाट निसर्गाच्या सान्निध्यात स्वत्त्वाचा शोध घेण्याची आस असते. ''वॉकिंग ऑन द एज'' मध्ये या साऱ्या भावनांचा प्रत्यय येतो. निसर्गाच्या अफाट पसाऱ्यात आपलं स्थान नेमकं समजून येतं आणि त्यापाठोपाठ येते ती आपल्या मर्यादांची जाणीव.

प्रसाद यांनी केवळ सह्याद्री भ्रमंती केली नाही. तशी भ्रमंती ते अनेक वर्षे करताहेत. हजारो लोक सह्याद्रीच्या दऱ्या-खोऱ्यांमध्ये वर्षानुवर्षे भटकताहेत. प्रसाद यांनी एका प्रकल्पाप्रमाणं अत्यंत निगुतीनं सह्याद्रीच्या कडा-कडांवर पावलं ठेवली. सातपुड्यातून केलेली सुरुवात बेळगाव-गोव्याच्या सीमेपर्यंत येता येता सह्याद्रीच्या कडा शब्दशः पालथ्या घातल्या. ''वॉकिंग ऑन द एज'' हा या प्रवासाचा सारांश आहे, असं म्हणावं लागेल.

महाराष्ट्राला सह्याद्री पर्वतरांगांचं अद्वितीय लेणं लाभलेलं आहे. या पर्वतरांगांनी इथली माणसं घडवलेली आहेत. या माणसांनी महाराष्ट्राची म्हणून संस्कृती निर्माण केली आहे. या निसर्गाचं, माणसांचं आणि संस्कृतीचं अनोखं दर्शन ''वॉकिंग ऑन द एज'' पुस्तकातून घडतं. चालायला सुरुवात केली, की सह्याद्री सोडला, तर बाकी सारं अनोळखी. अशा वेळी सारेच अनुभव नवे.

माणसांबद्दल विश्वास वाढवणारे अनेक अनुभव प्रसाद पुस्तकात मांडतात. बहुतांश अनुभव ऊर्जा देणारे असल्याचं त्यांचं सांगणं. सह्याद्रीच्या कडांवरून ७५ दिवस-रात्र चालताना प्रसाद यांना उपाशी झोपावं लागलं नाही, निवाऱ्याविना राहावं लागलं नाही, ते माणुसकीमुळं. त्यांचं सांगणं पुराव्यानिशी आहे. अनुभवातून साकारलेलं आहे.

रस्त्यांवरच्या ट्रॅफिकच्या कोंडीतून बाहेर पडून 'एसी'मधल्या कोंदटपणात आला दिवस पुढं जाणारं, अशा शहरी हवामानाला प्रसाद यांचं सारंच निवेदन जणू स्वप्नवत वाटेल. प्रसाद यांनी प्रवास करतानाच त्याचं लिखाण केलं. एकाच वेळी त्या लिखाणात ताजेपणा, तत्कालीन संदर्भांची अचूकता आहे, तसंच अशा लिखाणांमध्ये स्वाभाविकपणे राहते ती सखोलतेची मर्यादाही आहे.

कदाचित, त्यामुळंही असेल, पण प्रसाद यांचं लिखाण नुसता संदर्भग्रंथ झाला नाही. त्यामध्ये गोष्टीवेल्हाळपणा आलेला आहे. तो वाचकांना 'पुढं काय,' 'पुढच्या वाटेवर काय वाढून ठेवलंय...' अशी उत्सुकताही जागवून ठेवतो.

प्रसाद यांनी केलेला प्रवास मानवी शारीरिक आणि मानसिक क्षमतांची कमाल चाचणी घेणारा. आडनिड्या वाटांवरून, दऱ्या-खोऱ्यांतून चालणं ही झाली शारीरिक चाचणी. सतत अनोळखी परिसर. पोटातल्या भुकेची काळजी. मानवी वस्ती दिसण्यासाठीची अस्वस्थता. बहुतांश काळ सोबत राहणारा एकटेपणा. या साऱ्या मानसिक क्षमतांच्या चाचण्या. प्रसाद यांनी या साऱ्या चाचण्या दिल्या. सुरू केलेला प्रवास निश्चित ठिकाणी आणला.

'वॉकिंग ऑन द एज'मधून प्रसाद त्यांचे ७५ दिवसच सादर करत नाहीत, तर मनन-चिंतनातून येणारं विचारांचं सारही मांडतात. हे सार निसर्गरक्षणाचं, प्रदूषण, पर्यावरणीय बदलांचं, मानवी संबंधांचं, वाढत्या शहरीकरणाबद्दलचं आहे. त्यामुळंही, 'वॉकिंग ऑन द एज' भ्रमंती-वजा-निवेदन बनून राहत नाही, तर तो सह्याद्रीबद्दलचा सचित्र असा एक महत्त्वाचा दस्तऐवज ठरतो.

पुस्तकाचं नाव : वॉकिंग ऑन द एज

लेखक : प्रसाद निक्ते

प्रकाशक : समकालीन प्रकाशन, पुणे

पृष्ठं : २९६

मूल्य : ५०० रुपये

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Violence: मणिपूरमध्ये थरार! 2 तासांच्या चकमकीनंतर कुकी दहशतवाद्यांपासून 75 महिलांची सुटका

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: Ram Naik: ९० वर्षांचे भाजप नेते राम नाईक यांनी बजावला मतदानाचा हक्क

Loksabha Election : राज्यात आज अखेरचा टप्पा;मुंबई, नाशिकसह देशभरातील ४९ मतदारसंघांत मतदान

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 20 मे 2024

IPL 2024: अखेर साखळी फेरीची सांगता झाली अन् दुसऱ्या क्रमांकाची रस्सीखेच हैदराबादानं जिंकली

SCROLL FOR NEXT